Annasaheb More News: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग संस्थेचे सर्वोसर्वा अण्णासाहेब मोरे आहेत. त्यांना गुरुमाऊली देखील संबोधले जाते. आता त्यांचा संबंध वादग्रस्त वाल्मीक कराड यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न तृप्ती देसाई यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी मस्साजोगचे (बीड) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासाला एक वेगळी दिशा दिली. त्यामुळे वादग्रस्त आणि या प्रकरणाशी संबंधित वाल्मीक कराड याबाबत पोलिसांच्या सीआयडीने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. वाल्मीक कराड स्वामी समर्थ केंद्रात होता याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. यासंदर्भात अण्णासाहेब मोरे यांनी खुलासा करून सर्व आरोप फेटाळले आहेत.
या निमित्ताने श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे कोण? याविषयी अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. (कै) सद्गुरु मोरे दादा हे सामान्य शेतकरी कुटुंबात १९२४ दिंडोरी (नाशिक) मध्ये जन्माला आले. ते अध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी सद्गुरु पिठले महाराज यांच्याकडे गेले. तेथून त्यांनी अध्यात्मिक ज्ञान प्राप्त केल्यावर दिंडोरी येथे श्री स्वामी समर्थ केंद्र सेवा मार्ग ही संस्था सुरू केली. त्यातून शेतकरी आणि सामान्य समाजाला सन्मार्ग दाखविण्याचे काम झाले.
त्यांचा एक मोठा शिष्यवर्ग होता. तो दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राशी जोडला गेला होता. सद्गुरु मोरे दादांच्या नंतर हा अध्यात्मिक वारसा त्यांचे चिरंजीव अण्णासाहेब मोरे उर्फ गुरुमाऊली यांच्याकडे आला. श्रीराम खंडेराव मोरे हे गुरुमाऊली यांचे मूळ नाव आहे.
गुरुमाऊली यांनी दिंडोरी केंद्राचा सबंध महाराष्ट्रभर विस्तार केला. सध्या राज्याच्या विविध भागात त्यांचे शेकडो केंद्र आहेत. या सर्व केंद्राचे नियंत्रण गुरुमाऊली यांच्या संस्थेकडे आहे. गुरुमाऊली यांनी या संस्थेचे दुसरे केंद्र त्र्यंबकेश्वर येथे बनविले. येथेच त्यांनी रुग्णालय बनविण्यासाठी देखील एक विश्वस्त संस्था स्थापन करून त्र्यंबकेश्वरला मोठी जमीन घेतली आहे.
गुरुमाऊली यांना चंद्रकांतदादा आणि आबासाहेब हे दोन मुलगे आहेत. ती मुले देखील आता त्यांच्या कार्यात सहभागी झाली आहेत. एक मुलगा दिंडोरी येथील केंद्राचे सर्व कामकाज पाहतो. दुसरा मुलगा मुलगा त्र्यंबकेश्वर येथील संस्थेचे काम बघतो. श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून ते शासनाच्या विविध योजना तसेच उपक्रमांच्या प्रसारासाठी कृषी प्रदर्शन भरवीत असतो. त्यासाठी शासन त्यांना साह्य करते. त्यात स्वामी समर्थ मार्गाचे सर्व अनुयायी आपले श्रम, वेळ आणि आर्थिक असे सर्व प्रकारे योगदान देतात.
राज्यभर विस्तारलेल्या स्वामी समर्थ केंद्रांच्या माध्यमातून त्या त्या भागातील स्थानिकनेते, आमदार, खासदार लोकप्रतिनिधीही श्री स्वामी समर्थ केंद्र जोडले गेले आहेत. यातील अनेक आमदार आणि खासदार या केंद्राच्या प्रभावामुळे गुरुमाऊलींच्या नियमित भेटीला येत असतात. अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या भेटीला येतात. सरकार कोणतेही असो सरकारमधील मंत्र्यांना अण्णासाहेब मोरे आपल्या केंद्राला भेट देण्यासाठी आवर्जून निमंत्रित करतात आणि मंत्री देखील त्यांचा आग्रह मोडत नाहीत.
श्री. अण्णासाहेब मोरे हे अध्यात्म आणि विज्ञान समाजाला सोप्या भाषेत सांगण्यासाठी चर्चेत आहेत. त्यांनी अनेक धार्मिक विधी कसे करावेत हे सांगितले आहे. त्यांच्या सर्व केंद्रांवर मोठ्या संख्येने भक्तवर्ग त्या मार्गाचे अनुकरण करतात. विशेष म्हणजे या विषयाशी साधर्म्य असलेला "देऊळ बंद" हा सिनेमा देखील तयार झाला आहे. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुरुमाऊली भाविकांत चर्चेत आहेत.
आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गुरूमाऊली यांच्यावर थेट महिलांचे शोषण आणि वादग्रस्त वाल्मीक कराड यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. हे सर्व आरोप गुरुमाऊली यांनी फेटाळले. आपण कोणत्याही वाईट प्रवृत्तीला थारा देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. श्रीमती देसाई यांच्या आरोपामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, हे मात्र नक्की.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.