Dhangar Reservation  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा प्रश्न तापला : आता अहिल्यादेवींच्या भूमीतच सरकारशी चर्चा; यशवंत सेनेचा इशारा

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या 18 दिवसांपासून अहमदनगरच्या चौंडीत यशवंत सेनेच्यावतीने उपोषण-आंदोलन सुरु आहे. धनगर आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठकही झाली. मात्र, या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. बैठक होऊन तीन दिवस झाले तरी सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी आमदार राम शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानुसार, आम्ही त्यांना सांगितले की, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण माघे घेणार नाही. यापुढे सरकारबरोबर चर्चा ही अहिल्यादेवींच्या भूमीतच म्हणजे चौंडीतच होईल, असा इशारा उपोषणकर्ते आणि यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या 18 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले मुंबई येथे सरकारने आरक्षण संदर्भात बोलविलेल्या बैठकीला गेले होते. पण त्यावेळी झालेली चर्चा ही निष्फळ ठरली होती.

सरकारबरोबर झालेल्या चर्चेत आमच्या मागणीचा विचारच झाला नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा उपोषणाला बसलो. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. त्यांना चौंडीतील उपोषणकर्त्यांची भेट घेता आली नाही म्हणून दिलगिरी व्यक्त केली.

परंतु, त्यांचे पुत्र हे या भागाचे खासदार आहेत. 18 दिवस उलटले तरी त्यांनी या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे. ज्या धनगर समाजाच्या मतावर तुम्ही खासदार झालात, त्या मताचा तुम्ही अपमान केला. त्यामुळे धनगर बांधवांनी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवहान दोडतले यांनी केले.

दरम्यान, आमदार राम शिंदे हे शनिवारी चौंडीत आले असता त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात उपोषणकर्ते व धनगर समाजाचे सर्व आजी-माजी आमदार खासदारांना बोलवले होते. पहिली स्टेप म्हणून सरकारने आवश्यक ती पावले उचलली आहेत. पण उपोषणकर्त्यांनी धनगर समाजाला तातडीने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली व ते या मागणीवर ठाम आहेत.

सरकारच्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्याशी आजच संपर्क झाला. उपोषणकर्त्यांची मागणी सांगेल व ते पुढील पावले उचलतील. मी मंत्री असताना याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या धनगड व धनगर यामध्ये फक्त ड चा समावेश झाला आहे, त्यामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे, असे सांगितले. त्याचवेळी त्यांनी 24 तासात निर्णय घेऊन न्यायालयात याबाबत कायदेशीर कागदपत्रे देऊन बाजू मांडली, असे शिंदे यांनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT