Rajendra Singh & Sharad Pawar
Rajendra Singh & Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

...आणि शरद पवार यांनी पुण्यात मुळा-मुठा पात्रातील कामे थांबवली!

Sampat Devgire

नाशिक : नदीचा (River) प्रवाह हा तिच्या स्वत:च्या जमिनीवर असतो. या प्रवाहात म्हणजेच नदीपात्रात कॉंक्रिटीकरण आणि विकासाच्या, स्मार्ट सिटीच्या (Smart City) नावाखाली विविध प्रयोग करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन जलतज्ञ राजेंद्र सिंग (Rajendra Singh) यांनी केले.

गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी (ता. ५) विविध क्षेत्रांतील मान्यवरांना गिरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी श्री. सिंह बोलत होते. ज्येष्ठ वात्रटिकाकार, साहित्यिक रामदास फुटाणे अध्यक्षस्थानी होते. आनंद ॲग्रोचे अध्यक्ष उद्धव आहेर, नेमीचंद पोद्दार, पोलिस अधिक्षक सचिन पाटील, सुमंत मोरे, निखिल रुंगठा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार व्यासपीठावर होते.

यावेळी श्री. सिंह म्हणाले, की नदीचा प्रवाह हा तिच्या स्वत:च्या जमिनीवर असतो. या प्रवाहात म्हणजेच नदीपात्रात कॉंक्रिटीकरण आणि विकासाच्या, स्मार्ट सिटीच्या नावाखाली विविध प्रयोग करणे चुकीचे आहे. नदीच्या जागेवर तुम्ही कब्जा कसा काय करू शकता? असा माझा प्रश्‍न आहे. या विषयावर मी एकदा शरद पवारांशी बोललो होतो. त्यांनी तातडीने निर्णय घेऊन पुण्याच्या मुळा-मुठा पात्रातील कामे थांबवली. नाशिकमध्ये मला ज्यांच्या डोळ्यात नदी वाहताना दिसते अशा पालकमंत्री भुजबळ यांच्याही मी या विषयावर बोललो आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की, नदीला तिच्या नैसर्गिक स्वरूपात प्रवाहीत राहू द्या. पात्रांचा संकोच किंवा त्यात कामे उभी करणे हे स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत बसणार नाही.

प्रदुषणाच्या पार्श्‍वभूमीवर एकवीसावे शतक आणि विशेषत: कोरोनानंतरचा भविष्य काळ हा भयावह आहे. जगभरातील अनेक देशांना युरोप खंडाने ‘क्लायमेट रिफ्युजी’ असे संबोधन सुरू केलेले आहे. येत्या काही वर्षांत भारतही या पंक्तीत बसण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण अजूनही सावध झालो पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.

श्री. सिंह म्हणाले की, एकीकडे आपण नदीला आई म्हणतो. पण, हीच आई आज गंभीर आजारी असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो आहोत. नीर, नारी आणि नदी यांना नारायण मानणारी आपली संस्कृती आहे. आगामी पिढ्या ही संस्कृती जपतील का? असा प्रश्‍न पडतो. त्यादृष्टीने मोठे काम उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात श्री. फुटाणे यांनीही जनावरांच्या संवादाच्या माध्यमातून वात्रटिका सादर करताना ध्वनी प्रदुषण, जल प्रदुषण, लोकसंख्या, अन्न-पाण्याची कमतरता यासारख्या ज्वलंत प्रश्‍नांवर भाष्य केले. राजकारण, साहित्य आणि अन्य क्षेत्रांपेक्षा सध्या समाजसेवेत काम करण्याची मोठी संधी असल्याचे नमुद करतानाच इतरांसाठी जगणाऱ्यांचा हा सन्मान असल्याचे नमुद केले.

समाजसेवेसाठी हवेत अनेक हात

पुरस्कारार्थींच्या वतीने पोलीस अधिक्षक श्री. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी होणे गरजेचे आहे. वास्तविक कोणत्याही शहरात शांतताप्रिय नागरिक हेच पोलीस दलाचे प्रमुख बळ असते. तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. फुटाणे म्हणाले, की नदी जोड, माणूस जोड अशा धर्तीवर समाजसेवेच्या क्षेत्रात करण्यासारखी खुप कामे आहेत. त्यासाठी केवळ तळमळ असून चालणार नाही, तर श्री. सिंह यांच्यासारखे अनेक हात हवे आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT