Varun Sardesai
Varun Sardesai Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

लक्ष विचलित करण्यासाठी ‘डायरी’चा बोगस गाजावाजा

Sampat Devgire

जळगाव : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील जनतेसमोर आज समस्यांचा डोंगर उभा आहे. इंधनाचे भाव (Fuel price hike) दररोज वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढत आहे. या समस्येवरून सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपतर्फे (BJP) मीडियामध्ये चटपटीत बातम्या लावते आणि कुठली तरी ‘डायरी’काढून त्याचा गाजावाजा करते, असा आरोप युवा सेनेचे (Yuva Sena) प्रदेश सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केला. जळगाव येथे युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात युवा सेनेचा आज ‘निश्‍चय मेळावा’आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लताताई सोनवणे, चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना वरुण देसाई म्हणाले, की चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्रात सत्ता मिळविण्याचा एकमेव अजेंडा राबवीत आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारला कसे बदनाम करण्यात येईल, हाच त्यांचा गेल्या दोन वर्षांतील प्रयत्न आहे.

राज्यात केंद्रीय यंत्रणेचा दबाव

महाराष्ट्रातील सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. सर्व प्रयत्न करूनही सत्ता आपल्या हातात येत नाही, असे भाजपला दिसून आले आहे. त्यामुळे अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून आता केंद्रातील यंत्रणेचा दबाव आणून राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर दबाब टाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तसेच महागाईवरून लक्ष विचलित करण्यासाठी ‘डायरी’काढून त्यात हे सापडले, ते सापडले असे सांगून उगाच गाजावाजा केला जात आहे.

दरवाढीवरही मोंदीचे कौतुक

यूपीएच्या काळात इंधन दरवाढ झाल्यानंतर भाजपचे सर्व नेते रस्त्यावर येत होते. परंतु आता दररोज इंधन दरवाढ होते आहे, महागाई वाढली आहे. परंतु भाजपचे नेते रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसा ‘मास्टर स्ट्रोक’ लगावला, असे कौतुक करीत आहेत.

विद्यापीठासह निवडणुका लढविणार

शिवसेना आगामी काळात विद्यापीठासह सर्व निवडणुका लढविणार असल्याचे सांगून ते म्हणाले, की मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सर्व दहा सदस्य निवडून विक्रम केला आहे. त्याच पद्धतीने राज्यातील सर्व निवडणुका लढवून विजय मिळविला जाईल. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निवडणुका लढवून सर्वच्या सर्व दहा जागा जिंकण्यात येतील. त्यासाठी युवा सैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT