Uddhav Thackrey news: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लक्षणीय जागा मिळाल्या होत्या. ते यश विधानसभा निवडणुकीत टिकवून ठेवता आले नाही. अतिआत्मविश्वासामुळे हे घडल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केले आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपने फोर्टी प्लस अशी घोषणा दिली होती. महाविकास आघाडीने केलेल्या उत्तम राजकीय नियोजनाने या घोषणेतील हवाच निघून गेली. महाविकास आघाडीला ४८ पैकी ३१ जागा मिळाल्या होत्या. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रामुळे काठावर पास झाले.
मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. यामध्ये नेत्यांतील जागा वाटपाबाबत झालेल्या चुका आणि अति आत्मविश्वास कारणीभूत असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख ठाकरे यांनी मान्य केले आहे. लाडकी बहीण योजनेबरोबरच वरील कारणाने महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील यश टिकवून ठेवता आले नव्हते.
शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी पहिल्यांदाच ही कबुली दिली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये हा चर्चेचा विषय आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीच्या जागावाटपात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या कालावधीत खासदार राऊत यांचा आत्मविश्वास काही वेगळाच होता, हे लपून राहिले नाही.
शिवसेना नेते खासदार राऊत यांची भूमिका ही शिवसेनेच्या रणनीतीचा भाग होता. मात्र त्यातून आधी ठरलेल्या नियोजनापेक्षा राऊत यांनी ऐनवेळी अनेक बदल केले. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रभाव असताना तेथील जागा हट्टाने शिवसेनेकडे घेतल्या. अशीच स्थिती अन्यत्र काँग्रेसच्या जागांवर राऊत यांनी अधिकार सांगत त्या मिळवल्या.
विशेष म्हणजे धुळे शहरात शिविस उद्धव ठाकरे पक्षाकडे प्रबळ इच्छुक होते. मात्र ही एकमेव जागा सहकारी पक्षाला देण्यात आली. नाशिक शहरात सर्व तिन्ही जागांवर शिवसेनेने उमेदवार दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक पूर्व मतदार संघ देण्यात आला.
विशेष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नाशिक पश्चिम आणि देवळाली मतदारसंघातील उमेदवार चुकले होते. देवळाली मतदारसंघावर जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दावा होता. मात्र अवघ्या चोविस तास आधी राऊत यांनी दबाव टाकून ती शिवसेनेकडे घेतली. परिणामी सहकारी पक्षाचे नेते नाराज होऊन निष्क्रिय झाले. हीच स्थिती राज्यातील अनेक मतदारसंघात दिसून आली.
लोकसभा निवडणुकीत समन्वयाने कमावले ते नेत्यांच्या अति आत्मविश्वासामुळे विधानसभेत गमावले अशी स्थिती झाली. त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीच्या भवितव्यावर देखील झाल्याचे दिसून आले. प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपने आता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना खिळखिळे करण्यासाठी सत्तेचा उपयोग केला आहे.
या राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फटका शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांना बसला आहे. राजकीय दबाव व तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपने आपल्या गळाला लावले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या कबुलीने शिवसेना नेते राऊत यांच्या जागा वाटपातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.