Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : कांदा सडला, शेतकरी रडला.. तरी अधिकारी फिरकेना ; कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्याला कोणी वाली नाही..

Unseasonal rain in Nashik has caused major crop loss in the constituency of Agriculture Minister Manikrao Kokate : नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे

Ganesh Sonawane

Nashik News | नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात कांद्याच्या उभ्या पिकाचा शेतातच चिखल झाला आहे. पण अद्याप इथे अधिकारी वर्ग फिरकलेलाही नाही, त्यामुळे शेतकरी नाराज असून संतप्त झाले आहेत. कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकरी वाऱ्यावर असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यातील आहेत. पण तरीही कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी अवस्था झाली आहे. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातच कांदा साठवून ठेवला होता. आता झालेल्या अवकाळी पावसाने कांदा सडला आहे. लासलगावजवळील मरळगोई बुद्रुक, उमराणे, पिंपळगाव परिसरात कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील अद्याप झाले नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करत आहे.

काल कृषीमंत्र्यांचा तालुका असलेल्या सिन्नर तालुक्यालाही पावसाने झोडपलं. पावसाने शहर व तालुक्यात थैमान घातल्याने त्यात शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. सिन्रर तालुक्यात एका शेतकऱ्याचा २ एकरावरील कांदा शेतातच सडला आहे. इतरही अनेक शेतकऱ्यांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यात मरळगोई बुद्रुक येथील शेतकरी उत्तम नामदेव जगताप यांचे सुमारे पाच एकरावरील कांदा सडला आहे. त्यांनी बाजारभाव नसल्याने कांदा शेतात ठेवला होता, पण तो आता पावसाने सडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करणे गरजेचे आहे.

सिन्नर मध्ये झालेल्या पावसात बाजार समितीमधील खळ्यात पावसाचे पाणी साचल्याने कांदा गोण्यासह भिजला आहे. तर काही प्रमाणात कांदा अक्षरक्ष: वाहून गेला आहे. शेतीत भाजीपाला आणि बाजार समिती मधील कांदाचे मोठे नुकसान झाल्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या सततच्या पावसाने व खराब हवामानामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कांद्याचे साठ ते सत्तर टक्के नुकसान होऊन कांदा सडला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदाजानुसार परिसरातच शेकडो कि्व्टिंल कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने झालेल्या नुकसानीची पाहणी करावी व प्रतिक्विंटल किमान दोन हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान या पावसामुळे काल सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळला. यात शिवशाही बस व चारचाकीचा चक्काचुर झाला. दरम्यान, बसमधील प्रवाश्यांनी प्रसंगावधन राखून बाहेर पडल्यानं सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. हे बसस्थानक सिन्नरचे आमदार व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून उभारण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT