Swapnil Patil on The Kashmir Files Movie
Swapnil Patil on The Kashmir Files Movie  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काश्मीर फाईल्स; टॅक्स फ्री कशाला युटयूबवर पुर्ण फ्री करा!

Sampat Devgire

नाशिक : भाजपने (BJP) काश्मीर फाईल्स (Kashmir Files) सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे. सिनेमा टॅक्स फ्री केला तरी प्रेक्षकांना पैसे मोजावेच लागतील. त्यामुळे टॅक्स फ्री ऐवजी केंद्राने करमुक्त करावा किंवा निर्मात्याने हा सिनेमा युटयूब वर अपलोड करून पुर्ण फ्री करावा, असा चिमटा युवक काँग्रेसचे (Congress) जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील (Swapnil Patil) यांनी भाजपला घेतला आहे. (Swapnil Patil on The Kashmir Files Movie)

यासंदर्भात युवक काँग्रेसेतर्फे पत्र लिहिणार आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर काश्मीर फाईल्स सिनेमाचे चित्रपट निर्माते विवेक अग्नीहोत्री, भाजपच्या नेत्यांना संदेश पाठवला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीतून निर्वासीतांचे प्रश्न सोडवायचे आहेत की पैसे कमवायचे आहे, भाजपला काश्मीरी पंडीतांसाठी काही करायचे आहे, राजकारण करायचे आहे याचे उत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, भाजप गेली आठ वर्षे केंद्रात सत्तेत आहे. अशी एकही वस्तू, क्षेत्र नाही ज्यात त्यांनी महागाई वाढविलेली नाही. दररोज महागाईचा नवा विक्रम ते करीत आहेत. जनतेला त्रस्त करून सोडले आहे. या समस्या सोडविण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. सरकारचे ते प्रमुख काम आहे. त्याएैवजी राज्या राज्यातील भाजपचे नेते सध्या काश्मीर फाईल्स हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी करीत आहेत. अगदी विधीमंडळासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व्यासपीठावर देखील त्यांनी ही मागणी केली. त्यात या व्यासपीठाचा उपयोग त्यांनी सिनेमावरील राजकारणासाठी केला याचा खेद वाटतो.

ते म्हणाले, विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प, विकासाचे प्रश्न, निधी आणि विकासकामे या विषयावर राजकारण बाजुला ठेऊन त्यांनी चर्चा करायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. ते सिनेमा करमुक्त करण्याची मागणी लाउन धरतात. एक राजकीय पक्ष, त्याचे नेते व आमदार एका सिनेमाच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत. आजवर असे कधी पाहिले नव्हते. आमच्यासारख्या युवकांनी त्यातून काय अर्थ काढावा. सिनेमा करमुक्त करायचाच असेल तर केंद्र शासनाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा. पंतप्रधान एका मिनीटात केंद्राचा कर मागे घेऊ शकतात. त्याऐवजी त्यांनी राज्यांना आर्थिक झळ कशी बसेल असे राजकीय डावपेच आखले आहेत. दुसरीकडे या सिनेमाच्या निर्माते, कलाकारांना शपथविधीचे निमंत्रण दिले जात आहे. वाय श्रेणीची सुरक्षा देऊन जनतेचा पैसा चित्रपट निर्मात्यांच्या सुरक्षेवर खर्च केला जात आहे, याची खंत वाटते.

श्री पाटील म्हणाले, काश्मीरी पंडीतांवर १९९० मध्ये खुप अन्याय झाला, हे सर्वच मान्य करतात. त्यावेळी केंद्रात भाजप पुरस्कृत व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. लालकृष्ण अडवाणी व अन्य भाजप नेते त्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यांनी काय केले?. त्यांच्याच विचारसरणीचे जगमोहन राज्यपाल होते. त्यांनी काय केले? काश्मीरी पंडीतांच्या प्रश्नाला ही मंडळी जबाबदार नाही का?. गेली आठ वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. अनुपम खेर सतत या विषयावर बोलत आहेत. त्यांच्या पत्नी भाजपच्या खासदार आहेत. त्यांनी काय केले?.

ते पुढे म्हणाले, राजकारण करीतच आहात तर या प्रश्नाची उत्तरे त्यांनी द्यावीत. तत्कालीन विरोधी पक्षनेते व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी याविषयावर संसदेचे लक्ष वेधले होते. मार्चो काढला होता. त्याला भाजपने का प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा आधार भाजपला घ्यावा लागतो यात या पक्षाचा कमकुवतपणा दिसून येत आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT