Jalgaon Politics  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : सत्तासंघर्षातील 'तो' फंडा वापरून जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांनी आपल्याच नेत्यांना आणलं अडचणीत

कैलास शिंदे

Jalgaon Politics : राज्यातील सत्तासंघर्षाचे पडसाद आता थेट स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. जळगाव महापालिकेतील भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी थेट महापालिका आयुक्तांवरच अविश्वास ठराव आणला आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण नेत्यांनाही नगरसेवकासोबत जाण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. नेते आमचे श्रद्धास्थान आहेत, मात्र आम्ही आमचे ठरवून निर्णय घेत आहोत, असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे.

जळगाव महापालिकेत सद्या प्रशासन विरुद्ध नगरसेवक असा वाद सुरू आहे, यात आयुक्त विद्या गायकवाड यांच्यावर नगरसेवकांची नाराजी आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्तधारी असलेल्या व महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नगरसेवकांची अधिक नाराजी आहे. भाजपचे नगरसेवक डॉ. आश्विन सोनवणे यांनी आयुक्तांची बदली करण्यासाठी थेट साखळी उपोषण सुरू केले होते.

राज्यात भाजपचे सरकार आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपचे नेते गिरीश महाजन मंत्री आहेत, सहकारी पक्ष शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. सरकार म्हणून अधिकारी नियुक्ती त्यांच्याच शिफारशीनुसार होते. मग बदली करणेही त्यांना अवघड नाही. परंतु त्यांच्याच नगरसेवकांना एका अधिकाऱ्याच्या बदलीसाठी आंदोलन करावे लागले. प्रश्न एवढ्यावरच थांबला नाही तर बदली होत नाही म्हणून थेट अविश्वास प्रस्ताव आणावा लागला आहे. त्याला महापालिकेत. सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटाचा पाठींबा आहेच, परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा ही पाठींबा आहे.

राज्यात सत्ता असलेल्या गटाच्या नगरसेवकांना अधिकाऱ्याच्या बदलीसाठी थेट अविश्वास आणावा लागत असेल तर नेत्यांचे नगरसेवक असलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या मंत्री असलेल्या नेत्यांचे निर्णय मान्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेते जसे आपल्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य नसल्यास वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतात, तीच पद्धत जळगाव महापालिकेत नगरसेवकांनी अमलात आणली आहे.

मंत्री असलेले नेते आयुक्तांची बदली करीत नाही ना मग आम्हीच त्यांच्यावर अविश्वास आणतो त्यानंतरतरी राज्य सरकार म्हनून तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल, असे कोडेही टाकले आहे. दुसरीकडे नेते आमचे श्रद्धास्थान आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही प्रस्ताव आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मंत्री असलेल्या नेत्यांना कार्यकर्ते नगरसेवकांची भूमिका मान्य केल्याशिवाय सद्या तरी पर्याय नाही. मात्र नगरसेवकांनी आयुक्तांवर अविश्वास ठराव मंजूर केल्यास त्या नंतर बदली करण्याबाबत मंत्र्यांची कसोटीच ठरणार आहे.त्यामुळे जळगाव चे राजकारण सद्या तरी वेगळ्या वळणावर आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT