Kautikrao Thale Patil
Kautikrao Thale Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संमेलनासाठी राबणाऱ्या चाळीस समित्यांत सर्व राजकीय नेते होते का?

Sampat Devgire

नाशिक : मराठी साहित्य महामंडळाचे (Literature) अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील (Kautikrao Thale Tatil) यांनी नाशिकच्या साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांनी लुडबूड केल्याची टिका केली होती. त्यामुळे नाशिकच्या (Nashik) नेते, संयोजकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. या संमेलनासाठी राबणाऱ्या चाळीस समित्या व त्यातील कार्यकर्ते, साहित्य प्रेमी सर्व राजकीय नेते होते का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लोकवर्गणीतून साधेपणाने न होता, संमेलनाचा इव्हेंट करण्यात आला. तसेच नाशिककर आयोजकांनी दिलेले शब्द फिरवले अशी टीका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी केली होती. त्यावर नाशिककरांनी पलटवार करताना, मराठी साहित्य महामंडळ आणि कौतीकराव ठाले पाटील यांच्या कार्यशैलीतच एकाधिकारशाही असून, तीन व्यक्तींमध्ये संमेलन होवू शकत नसल्याचे म्हटले आहे.

आमची भूमिका कार्यकर्त्यांची

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अधिसूचनेनुसार संमेलनाचे संयोजक, स्वागत समिती काम करत असते. ठाले पाटील यांच्या सूचनेनुसारच संमेलनाचे कामकाज सुरू होते. चाळीस समित्यांमधील रात्रंदिवस राबणारे हात असो, की औरंगाबादला संमेलनाच्या कामकाजाविषयी दौरे करणे असो, हे महामंडळाच्या आदेशाचे पालन करणेच होते. कोरोना काळात संमेलनाचे नियोजन करण्यात आले. संमेलनाच्या संपूर्ण कामकाजात आमची भूमिका कार्यकर्त्यांची असल्याचे निमंत्रकजयप्रकाश जातेगावकर यांनी नमूद केले.

नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे लोकवर्गणी, लोकसहभाग कमी दिसून येत आहे. संमेलनाच्या हिशेबात काही देणग्या येणे बाकी आहेत. तसेच, जीएसटी, टीडीएस परताव्याला वेळ लागत असल्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात हिशेब मांडला जाणार आहे. संमेलनात प्रत्येक निर्णय महामंडळाच्या अनुमतीनेच घेतला आहे. संमेलनात राजकीय व्यक्ती होते; परंतू संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी केला नाही. तीन व्यक्तींमध्ये संमेलन न होता सामान्य व्यक्तींनीही संमेलनात मोठी हजेरी लावली. याशिवाय २५ लाख लोकांनी संमेलन ऑनलाइन बघितले, असे त्यांनी सांगितले.

महामंडळाची एकाधिकारशाही

माजी संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ठाले पाटील यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, स्वागतसमितीवर केलेले आरोप अन्यायकारक आहेत. स्वागत समिती महामंडळाच्या सूचना, धोरणांची अंमलबजावणी करते. मात्र, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य समितीला नसते. त्यामुळे अशा आरोपांना अर्थ राहात नाही. कोरोनाच्या परिस्थितीत संमेलन पार पडले. नाशिककरांचे कोरोनाकाळातले प्रयत्न महामंडळाने अदखलपात्र ठरविले आहेत. संमेलन उत्सवासारखेच झाले आहे. महामंडळाच्या कार्यशैलीतच एकाधिकारशाही असून, स्वागत समितीवर महामंडळाचे टोकाचे नियंत्रण असते.

यासंदर्भात कवी प्रकाश होळकर म्हणाले, महाराष्ट्रात राजकीय व्यक्तींना साहित्यात रूची असणे, यात काही वावगे नाही. संमेलनं भव्यदिव्यच व्हायला हवीत. मात्र, विभागीय संमेलनही वाढायला हवीत. संमेलनाच्या पत्रिकेतील नावं, दिग्गज साहित्यिक अनुपस्थितीत राहतात. महामंडळाने असे आरोप न करता तरूणांची सांस्कृतिक जडणघडण कशी होइल याकडे लक्ष द्यावे.

संमेलनाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार हेमंत टकले यांनी नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनाबाबत महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी असे आरोप करणे दुर्दैवी आहे. कोरोनामुळे लोकसहभाग कमी झाला. संमेलनात राजकीय व्यक्तींचा सहभाग असणे, यात चूकीचे काहीच वाटत नाही. ठाले पाटील यांनी संयोजकांची बाजू समजून घेत टीका करावी, असे सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT