Sharad Pawar, NCP President.
Sharad Pawar, NCP President. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शरद पवार म्हणाले, `मी सर्व मदत करतो, आधी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे रहा`

Sampat Devgire

रानवड : ऊसापासून केवळ साखर नव्हे तर इथेनॅाल, वीज आणि रासायने तयार करण्याचा प्रयत्न करावा. त्यातून वाचणारे पैसे चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, ऊसाला द्या. त्यासाठी भरमसाठ भरती टाळावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांनी दिला.

रानवड सहकारी साखर कारखान्यांच्या ३९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमीताई पवार, आमदार सर्वश्री माणिकराव कोकाटे, नितीन पवार, सरोजताई अहिरे, किशोर दराडे प्रमुख पाहुणे होते.

श्री पवार यांनी सुरवातीलाच कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या कार्य-कर्तृत्वाचा आढावा घेतला. कर्मवीर वाघ एकट्या रानवड किंवा निफाडच्या कारखान्याचे नव्हे तर सबंध राज्याच्या साखर संघाचे नेतृत्व करीत होते. त्यांनी स्थापन केलेला कारखाना अडचणीत येतो. बाहेरचे लोक तो चालवतात. शेतकरी, कामगारांचे पैसे थकवतात, हे बरे नाही.

यावेळी श्री. पवार म्हणाले, साखर कारखाना चालविणे हे राजकारण नव्हे तर धंदा आहे. त्याद्यष्टीने त्याकडे पहावे. त्यात राजकारण न आणता सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. आपल्याकडे ऊस लावला की, शेतकरी त्याच्या लागवड, पाण्याची आणि खताची व्यावस्था केली की निर्धास्त होतात, मग राजकारणाची चर्चा करायला मोकळे होतात. पंतप्रधान मोदींनी काय केले, राज्याच्या राजकारणात काय सुरु आहे, कोण काय करतो आहे, त्याच्यावर टिपणी करत बसतात. मात्र हे टाळावे. मोदींनी काय केले त्याची चर्चा नंतर करता येते, आधी आपल्या ऊसाचे व शेतीचे काय झाले याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

ते म्हणाले, ऊसाबाबत आपल्याकडे किती भाव मिळतो याची सदैव चर्चा होते. काही कारखाने बत्तीसशे रुपये देखील भाव देतात. आपल्यालाही सत्तावीसशे, ते तीन हजार भाव देता येईल. मात्र त्यासाठी ऊसाचे उत्पादन किती, एकरी टनेज किती व कारखान्यात तो ऊस आल्यावर त्याला उतारा किती मिळाला यावर सर्व अवलंबून असते. त्यासाठी आपण ऊसाच्या गुणवत्तेत भर टाकण्यासाठी लक्ष घालावे लागेल.

ज गात ब्राझील येथे सर्वाधिक साखर उत्पादन होते. मात्र ब्राझिल व थायलंड येथील ऊसाचे टनेज घटले आहे. त्यामुळे जगभरात साखरेची अडचण झाली आहे. त्यामुळे आपल्या साखरेला संधी आहे. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आपल्याकडे साखर कारखाना म्हणजे राजकारण. निवडणूक. त्यात सगळ्यांना सांभाळून घेण्यासाठी नोकऱ्या द्याव्या लागतात. त्यामुळे भरमसाठ भरती होते. त्यात खर्च वाढतो. अडचणी येतात. तसे करू नका. कमी भरती करा. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, शेतकऱ्यांना व ऊसाला पैसे द्या. तुमच्या कारखान्यात आव्हाने आहेत. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटने योग्य सल्ला दिलेला आहे. त्यानुसार आमदार बनकरांनी चांगली योजना आखली आहे. ते योग्य दिशेने चालले आहेत. त्यांना यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व मदत करू. मात्र तुम्ही त्यांच्या पाठीशी ऊभे राहिली पाहिजे. तुम्ही त्यांना मदत करा.

यावेळी राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष राम शेटे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, माणिकराव बोरस्ते, तानाजी बनकर, भागवतबाबा बोरस्ते, डी. बी. मोगल, मंदाकिनी बनकर, सुभाषराव कराड, माजी खासदार देविदास पिंगळे आदी उपस्थित होते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT