Chhagan Bhujbal-Dhananjay Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Morning Oath Ceremony : पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कोणी रचलं?; छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Chhagan Bhujbal On Dhananjay Munde Shirdi Statement : आम्हालाही याबाबत काय ठरलं. नाही ठरलं, याची कल्पना नव्हती. त्यानंतर आम्ही इकडं तिकडं गेलेल्या आमदारांना गोळा करायला सुरुवात केली. हे मला माहिती आहे.

Vijaykumar Dudhale

Nashik, 20 January : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी शिर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं, असे विधान केले आहे. मग ते षडयंत्र कोणी रचलं? असा सवाल ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे दोन दिवसांचे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात बोलताना मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं. त्या शपथविधीला जाऊ नका, अशी अजितदादांच्या पायावर डोके ठेवून विनंती केली होती. मात्र, ते गेले, अशी आठवण सांगितली होती. त्यावरून गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्याबाबत भुजबळ हे बोलत होते.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होते, तर ते कोणी रचले. उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत. कोणी रचलं कोणी. काँग्रेसही रुचू शकत नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकांनी रचलं की भारतीय जनता पक्षातील लोकांनी रचलं, याची काहीच माहिती नाही. मला एवढं माहिती आहे की, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी तीनही पक्षांच्या बैठका सुरू होत्या.

एका बैठकीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खर्गे हे होते. त्या बैठकीत खर्गे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी थोडासा वाद झाला आणि पवार हे रागाने निघून गेले. त्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही महत्वाच्या बैठका सुरू होत्या. त्यानुसार रात्री आठ वाजता एका ठिकाणी बैठक बोलावली गेली होती. त्या बैठकीला अजित पवार हे हजर नव्हते. म्हटलं कुठंतरी कामात अडकले असतील, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

भुजबळ म्हणाले, दुसऱ्या दिवशी सकाळी आठ-नऊ वाजता टीव्ही लावला. त्यावेळी लक्षात आलं की अजितदादांचा शपथविधी झालेला आहे. मी तातडीने शरद पवार यांच्याकडे गेलो. तोपर्यंत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करून आपण मजबुतीने उभं राहिलं पाहिजे. हा प्रयत्न आपण होणार नाही, यासाठी आपण कामाला लागूया, असे सांगितले होते.

आम्हालाही याबाबत काय ठरलं. नाही ठरलं, याची कल्पना नव्हती. त्यानंतर आम्ही इकडं तिकडं गेलेल्या आमदारांना गोळा करायला सुरुवात केली. हे मला माहिती आहे. त्यानंतर मी स्वतः अजित पवार यांच्या घरी गेलो, तुम्ही असं करू नका, तुम्ही राष्ट्रवादीत परत चला, असं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमचं अवघड झालं आहे, तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीत चला म्हणून मी विनंती केली, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.

अजित पवार राष्ट्रवादीत आल्यानंतर मी स्वतःच त्यांना उपमुख्यमंत्री करा, असा ठरावा मांडला. त्यामुळे इच्छुकांना वाईटही वाटलंत. ते माझ्यावर रागावलेही होते. पण मला त्यावेळी जे योग्य वाटले, ते मी केले. आता काल धनंजय मुंडेंनी जे मांडलं. त्यांचा रोख कोणाकडे होता. याबाबत कल्पना नाही, ते त्यांनाच विचारा, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT