Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नितीन गडकरी `ते` तापदायक ११० स्पीड ब्रेकर हटवतील का?

Sampat Devgire

धुळे : धुळे, (Dhule) चांदवड, पिंपळगाव महामार्गावर टोल वसुली सुरू आहे. मात्र, या मार्गादरम्यान स्पीड ब्रेकर तापदायक झाले असून, निकषानुसार अपेक्षित रस्त्याची निगा, सुशोभीकरण, प्राथमिक सुविधांची उपलब्धता, आवश्यक त्या ठिकाणी प्रकाश योजना, दुभाजक व मार्गावर दुतर्फा वृक्षारोपणाच्या अंमलबजावणीत अभाव दिसतो. धुळे- नाशिक प्रवासातील अनुभव वेगळे आहेत, असे सांगत डॉ. उल्हास पाटील, (Dr Ulhas Patil) नितीन बंग (Nitin Bang) यांनी याप्रश्‍नी केंद्रीय मंत्री (Centre Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जातीने लक्ष घालावे, अशी मागणी केली.

राज्य शासनाने निर्माण करायच्या पायाभूत सुविधा या दर्जेदार व्हाव्यात, नागरिकांना सुखकर व्हाव्यात, यासाठी पायाभूत सुविधा खासगीकरणातून केल्या जात आहे. त्यातील खर्च, गुंतवणुकीची परतफेड या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनचालकांकडून ठराविक रक्कम, ठराविक काळासाठी घेऊन केली जावी, असे अपेक्षित आहे. धुळे ते पिंपळगावदरम्यानच्या सरासरी १३० किलोमीटरच्या प्रवासात सरासरी ११० गतिरोधक आहेत. यात प्रत्येक गतिरोधकामध्ये किमान तीन, तर जास्तीत जास्त सहा गतिरोधके आहेत. राष्ट्रीय महामार्गावर इतकी गतिरोधके कायदेशीर आहेत का? धुळे- इदूंरपर्यंत शंभर किलोमीटरवर गतिरोधक फारच कमी आहेत.

टोल मार्गावरील अडचणी

लळींग ते नाशिकपर्यंतच्या रात्रीच्या प्रवासात दुभाजकांमध्ये वृक्षारोपण न झाल्याने समोरच्या वाहनाच्या प्रखर प्रकाशाचा इतर वाहनांना त्रास होतो. काही वर्षातच खड्ड्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. रस्त्याच्या दर्जाबाबत शंका आहे. खड्डे बुजविण्याची पद्धत फारच आगळीवेगळी वाटते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खुलासा होत नाही. रस्त्याच्या दुतर्फा पुरेशी झाडे नसल्याने सावलीसाठी हॉटेलचा सहारा घ्यावा लागतो.

चालकाला भुर्दंड का?

चांदवड- पिंपळगाव येथील टोलनाक्‍यावर स्थानिक वाहनांना टोलच्या रक्कमेत सूट दिली जाते. ती सूट लळींग (धुळे) टोलनाक्यावर मिळत नाही. स्थानिक वाहनधारकाला लळिंग, तेथून रोकडोबा हनुमान मंदिर या क्षेत्रात काही प्रमाणात टोल दिल्याशिवाय जाता येत नाही. पिंपळगाव बसवंत ते नाशिकचे अंतर केवळ ३१ किलोमीटर आहे, पण धुळ्याहून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशाला पूर्ण टोल द्यावा लागतो. तो प्रतिसहा रुपये किलोमीटरपेक्षा जास्त पडतो. देशात कोणत्याही महामार्गावर इतका टोलचा भुर्दंड नागरिकांना नाही.

यंत्रणेबाबत काही प्रश्‍न

ही स्थिती पाहता खासगीकरणाच्या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाचा अंकुश आहे का? टोल वसुलीसोबत सुविधा, दुरुस्ती, बदलाकडे दुर्लक्ष का? प्राधिकरणाने संबंधित कंपनीला सांगितले व त्यांनी कराराप्रमाणे निकषाचे पालन केले नाही, तर टोलवसुली बंद का केली नाही? टोलवसुली करणाऱ्या कंपनीच्या अरेरावीला आवर घालण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक प्रतिनिधी कंपनी कार्यालयात का नियुक्त केला जात नाही, असे प्रश्‍न उपस्थित करीत डॉ. पाटील, श्री. बंग यांनी मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT