IGP Dr B. G. Shekhar
IGP Dr B. G. Shekhar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धुळे शहराला गालबोट लागू देणार नाही!`

Sampat Devgire

धुळे : रमजान ईद (Ramzan Id) आणि अक्षयतृतीया एकाच दिवशी येत आहेत. त्यातून प्रत्येकाने एकात्मता (Unity) आणि एकतेचा संदेश द्यावा. धुळ्याला (Dhule) गालबोट लावू देऊ नका. सौहार्दपूर्ण आणि शांततापूर्ण वातावरणात सण साजरे करावेत असे आवाहन करत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर (Dr. B. G. Shekhar) यांनी केले.

ते म्हणाले, प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरील दिशाभूल, अफवा पसरविणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करू नये, कुणीही कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी शांतता समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा अध्यक्षस्थानी होते. महापौर प्रदीप कर्पे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अपर आयुक्त नितीन कापडणीस, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, महेश जमदाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे आदी प्रमुख पाहुणे होते.

डॉ. शेखर म्हणाले, की जिल्ह्यातील अनेक व्यक्तींनी विधायकतेतून जागतिक स्तरावर नावलौकिक कमावला आहे. तो सामूहिक प्रयत्नातून उंचावत ठेवत शहरासह जिल्ह्याचा औद्योगिक, सामाजिक, आर्थिक विकास साधला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करताना कुणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील संदेशाच्या पडताळणीसाठी सायबर पोलिस सेल, मीडिया पोलिस सेल कार्यरत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करावे.

नागरिकांच्या काही तक्रारी, अडचणी, शंका असतील, तर त्यांनी पोलिस अधिकारी किंवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच अनुचित प्रकारांबाबत पोलिसांना माहिती द्यावी. महापौर कर्पे म्हणाले, की शहरासह जिल्ह्यात सर्वांचेच एकमेकांशी सौहार्दपूर्ण आणि प्रेमाचे संबंध आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातील. जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, की सण-उत्सव काळात सर्वांनी सौहार्दपूर्ण वागावे, विकासाचा मार्ग धरावा, आर्थिक विकास साधावा आणि कायदा सुव्यवस्था, शांतता नांदण्यासाठी सहकार्य करावे. सोशल मीडियाच्या वापरात स्वत:वर काही बंधने घालावीत.

विघातक प्रवृत्तींवर बारीक लक्ष

जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, की जिल्हा पोलिस प्रशासन खंबीरपणे काम करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने पोलिस दलाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. समाजातील विघातक प्रवृत्तींवर पोलिस दलाचे बारीक लक्ष आहे. सायबर सेल, मीडिया सेल, गुप्तचर यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. त्यामुळे प्रत्येकाने विचारपूर्वक कृती करावी. एम. जी. धिवरे, अब्दुल सत्तार शाह, मुकुंद कोळवले, हिरामण गवळी, रईस हिंदुस्थानी, राज चव्हाण, आनंद लोंढे आदींनी मनोगत व्यक्त करत पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT