Chhagan Bhujbal, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yeola Politics : मतदारसंघ भुजबळांचा, निमित्त पाण्याचं, एन्ट्री गिरीश महाजनांची

Sampat Devgire

Chhagan Bhujbal Vs Girish Mahajan :

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात पाटचाऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागापुढे उपोषण सुरू केले आहे. यामध्ये मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना हस्तक्षेप करावा लागला.

पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी नोंदवून शुल्क भरलेल्या गावांना पाणी मिळावे यासाठी भाजपच्या नेत्या अमृता पवार (BJP Leader Amruta Pawar) चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले. या प्रश्नावर शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांवर दोषारोप केले आहे. त्यामुळे हा प्रश्न चांगलाच तापला आहे.

पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आणि भाजप (BJP) नेत्या अमृता पवार यांनी चारी क्रमांक 24 आणि 25 चे कुलूप तोडून पाणी चाऱ्यांना सोडले. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी यंदा मोठी टंचाई आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक होऊन पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचे दिसून आले. पण राजकीय दबावापोटी अधिकारी काही गावांवर अन्याय करीत असल्याचेी तक्रार भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

यासंदर्भात तीन ठिकाणी शेतकऱ्यांनी अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून पाणी मिळवले. याबाबत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या समर्थकांकडून भाजपवर कायदा हातात घेऊन कारवाई करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन अस्वस्थ झाले असून अमृता पवार यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, आजही पालखेड कालव्याच्या शेवटी असलेली (टेल) अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली आहेत. विशेषतः सुरेगाव, देवळाणे, देवठाण, बोकटे, खामगाव गवंडगाव, अंदरसूल यांसह विविध भागातील शेतकरी पाटबंधारे विभागाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. चार दिवसांपासून दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पुढे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे प्रयत्नदेखील अपुरे पडले आहेत. त्यानंतर भाजपच्या अमृता पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या कानावर हा विषय टाकल्यानंतर संबंधितांना पुढच्या रोटेशनला पाणी देण्याचे आश्वासन देऊन काल हे उपोषण मागे घेण्यात आले.

मंत्री भुजबळ यांच्या मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नावर भाजप आणि भुजबळसमर्थक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शेवटी त्यात मंत्री महाजन यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे पाणीप्रश्नावरून दुष्काळग्रस्त येवला मतदारसंघात राजकारण चांगलेच तापले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT