विदर्भ

६ गावांतील २०० शेतकऱ्यांचा नाना पटोलेंच्या घरासमोर ठिय्या…

Abhijeet Ghormare

भंडारा : विजेचा प्रश्‍न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. शेतकऱ्यांना दिवसाला धड एक तासही वीज मिळत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेवटी वैतागून लाखांदूर तालुक्याच्या ६ गावांतील २००च्या वर शेतकऱ्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या सुकळी येथील घरासमोर ठिय्या आंदोलन केले.

गेल्या ५ ते ७ वर्षांनंतर प्रथमच राज्यात (Maharashtra) लोडशेडींग (Load Shading) होते आहे. ज्या लोडशेडींचा लोकांना विसर पडला होता, तो जीवघेणा प्रकार पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सामान्य लोकही वैतागले आहेत. सध्या विदर्भातील (Vidarbha) रणरणत्या उन्हात कुणाचीही बाहेर निघण्याची इच्छा होणार नाही. पण या सरकारने वेळच तशी आणली आहे की, शेतकऱ्यांना तळपत्या उन्हात आंदोलने करावी लागत आहे. आजही लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संतप्त होऊन नाना पटोले (Nana Patole) यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.

अतिरिक्त लोडशेडींग बंद करून नियमित ८ तास शेतातील वीज पुरवठा सुरू ठेवावा, या मागणीसाठी शेतकरी एकत्र आले. बारव्हा, जैतपुर, खोलमारा, तावशी, साखरा व चिकना येथील २००च्या वर शेतक-यांनी नाना पटोलेंच्या साकोली तालुक्यातील सुकळी येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. ६ दिवसांपासून परिसरातील शेतकऱ्यांना १ तासही बरोबर वीज मिळत नसल्याने पिके उन्हाने वाळत चाललेली बघून या शेकडो शेतक-यांनी पटोलेंच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान वीज वितरण विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेले आश्‍वासन पाळावे आणि पुन्हा आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये, असे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेताना सांगितले. शेतीची कामे सोडून आम्हालाही आंदोलने करायला वेळ नाही, पण असे लोडशेडींग सुरू पाहिल्यास डोळ्यांसमोर पिके उन्हाने होरपळून जातील, मग काय करणार. म्हणून आज आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला, असे शेतकरी चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी सांगितले. गेल्या वर्षी तरी ठीक होते, पण यावर्षी वीज नसल्यामुळे आम्ही हैराण झालो आहोत, असेही ते म्हणाले.

आमचे मुख्य पीक धानाचे आहे. मागच्या वर्षी आम्हाला १० तास वीज मिळत होती. गेल्या वर्षी आम्हाला १० तास वीज पुरवठा होत होता, यावर्षी ८ तास मिळतो आहे. गेल्या ५-६ दिवसांपासून अतिरिक्त लोडशेडींग सुरू केल्यामुळे रात्रीच्या वेळी फक्त २ तास वीज मिळते आणि दिवसा ८ तास मिळते. सद्यःस्थितीत धानाचे पीक गरभ्यामध्ये आलेला आहे आणि आत्ता जर आम्हाला पुरेशी वीज मिळाली नाही, तर शेतकऱ्यांनी लावलेली लागत पूर्णतः बुडणार आहे, असेही टेंभूर्णे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT