Bachchu Kadu and Manoj Jarange Patil  Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu MahaElgar : बच्चू कडू, जरांगेंचा पॅटर्न अन् टार्गेट एकच, बोलविता धनी कोण? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Bachchu Kadu and Manoj Jarange : बच्चू कडू आणि जरांगे यांच्या आंदोलनाची पद्धत एकसारखीच आणि मुख्यमंत्र्यांना वेठीस धरणारी असल्याने पुन्हा एकदा बोलविता धनी कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे

Rajesh Charpe

Nagpur News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे वारंवार महायुती सरकाराला कोंडीत पकड होते. ते आपला राग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढत होते. त्यांच्या आंदोलनासाठी होणारी गर्दी आणि रातोरात होणारी व्यवस्था बघून पडद्यामागे कोणीतरी मोठा नेता असल्याची शंका व्यक्त केली जात होती. आता तेच जरांगे बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी आपला पाठिंबाही जाहीर केला.

यापूर्वी जातीसाठी लढलो आता शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांची आणि जरांगे यांच्या आंदोलनाची पद्धत एकसारखीच आणि मुख्यमंत्र्यांना वेठीस धरणारी असल्याने पुन्हा एकदा बोलविता धनी कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी, रविकांत तुपकर, वामनराव चटप, महादेव जानकर आदी सहभागी झाले आहेत. कडू यांच्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये दोन दिवस अभूतपूर्व कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीची दखल घेऊन उच्च न्यायालयाने रस्ता मोकळा करण्याचा आदेश बच्चू कडू यांना दिला होता. पोलिसांनाही याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र बच्चू कडू यांनी मागे हटणार नाही, आम्हाला जेलमध्ये टाका अशी भूमिका घेतली.

या दरम्यान त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सरकारने राज्यमंत्री पकंज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना पाठवले होते. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोन्ही नेत्यांचे शिष्टमंडळाने बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला जाण्यास नकार दिला. गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ते मुंबईला रवाना झाले. त्यापूर्वी मनोज जरांगे नागपूरमध्ये दाखल झाले. कडू यांची भेट घेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

बच्चू कडू यांनी आंदोलनासाठी सरकारची कोंडी करण्याचा पॅटर्न वापरला. जरांगे यांनी मुंबईची कोंडी केली होती. त्यांनाही कोर्टाने मैदान खाली करण्याचे आदेश दिले होते. मात्र ते हटले नाही. शेवटी सरकारला झुकावे लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार जीआर काढला. कडू यांनी आंदोलनासाठी मुंबईऐवजी मुख्यमंत्र्यांचे शहर निवडले. आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाची निवड केली.

दोन दिवस त्यांच्या आंदोलनामुळे नागपूरची वाहतूक ठप्प पडली होती. सरकारच्या विरोधात आंदोलन असल्याने सर्वच विरोधकांनी कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यात जरांगेसुद्धा सामिल झाले. कुठल्यातरी बड्या नेत्याचा किंवा पक्षाचा छुपा पाठिंबा आणि रसदीशिवाय एवढे मोठे आंदोलन उभेच राहू शकत नाही. अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT