uday samant google
विदर्भ

Maharashtra Government : मंत्रालयातील आणखी काही ‘केबिन’ लवकरच उघडणार

Atul Mehere

Nagpur Political News : ज्या क्षणाची अख्ख्या महाराष्ट्रातील जनता, अनेक आमदार प्रतीक्षा करीत आहेत, तो क्षण लवकरच जवळ येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू आहे. तीनही नेते निर्णयाप्रत आले की, मुंबईच्या मंत्रालयातील आणखी काही ‘केबिन’ लवकरच उघडतील, असे सूचक संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेत. (A few more cabins in the ministry will open soon in Maharashtra)

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या सामंत यांनी शुक्रवारी (ता. २७) नागपुरात सांगितले की, सध्या सरकारपुढे मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांत आधी आहे. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी यांच्या आरक्षणातील तिढा सोडविण्याला सरकार प्राधान्य देणार आहे. एकदा हा प्रश्न सुटला की त्यानंतर मंत्रालयातील दालनांची साफसफाई सुरू होईल, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. परंतु लवकरच तो होईल व त्याला खऱ्या अर्थाने विस्तार म्हटता येईल, असं सामंत यांनी सांगितलं.

राज्यातील अनेक आमदार सध्या मंत्रिमंडळाच्या या विस्ताराकडे डोळे लाऊन बसले आहेत. महामंडळांवरील नियुक्तीचाही मुद्दा कायम आहे. परंतु सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असल्याने त्याकडं दुर्लक्ष करून मंत्रिमंडळ विस्तार करत बसणं संयुक्तिक ठरणार नाही हे नागपुरात सांगण्याचा प्रयत्न सामंत यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांना आपणही भेटलो होतो. अनेक जण मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान द्यायला गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचंय हा सरकारचा निर्णय झालाय. नागपूरच्या सुपुत्रानं ते दिलं होतं असा उल्लेख करीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केले. तेव्हाचं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होतं. मात्र, सरकार बदलताच आरक्षण कसं टिकलं नाही, असा सवालही सामंत यांनी केला. आता शिंदे हेदेखील असंच मजबूत आरक्षण देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अपात्रतेच्या विषयावरही ते ठाम होते. ‘आम्ही योग्य ती कागदपत्रं निवडणूक आयोगाकडे दिली. त्यामुळे आयोगानं धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या ताब्यात दिला. तशाच पद्धतीचे खरी कागदपत्रं खोट्या सह्या न मारता विधानसभा अध्यक्षांकडेसुद्धा सादर करू’, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला.

विधानसभा अध्यक्षांवर, कायद्यावर, संविधानावर आणि सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. विधानसभा अध्यक्ष कायद्याने जो योग्य असेल तोच निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं. ठाकरेंपासून वेगळं झालेल्या आमदारांना ते शिव्या हासडतात. ठाकरे कधी शिव्या घालत नाहीत, कुणाला शिव्या घालत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडविली.

(Edited by : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT