Sangram Kote Patil Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीचे ‘मिशन जनरेशन नेक्स्ट’, अजित पवारांनी दिली संग्राम कोते पाटलांवर जबाबदारी !

Atul Mehere

Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ नेत्यांचा पक्ष आहे, अशी ओळख किमान विदर्भात तरी या पक्षाची असल्याचे नेहमी बोलले जाते. पण आता राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाची ही ओळख पुसण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केले जात आहेत. यासाठी अजित पवारांनी त्यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच युवक व विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य समन्वयक यांच्यावर सोपवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला आता फक्त नेते आणि कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित ठेवायचे नाही. याकरिता पक्षाने ‘मिशन जनरेशन नेक्स्‍ट' सुरू केले आहे. या अंतर्गत चांदा ते बांदा या दरम्यान सर्व शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला जात आहे. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या गरजाही जाणून घेतल्या जात आहेत. संग्राम कोते पाटील यांच्यावर या मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर येथील युवकांशी त्यांनी सोमवारी (ता. 4) संवाद साधला. आज (ता. 5) त्यांनी नागपूर सकाळ कार्यालयात ‘सकाळ संवाद' कार्यक्रमांतर्गत मिशनची माहिती दिली.

तत्पूर्वी संग्राम कोते पाटील यांनी आतापर्यंत मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफीसाठी तब्बल ३२ मोर्चे काढले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन ११४ आंदोलनाच्या माध्यमातून पाच लाख विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेतले. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध महाविद्यालयांमध्ये पक्षाच्या बाराशे शाखा उघडल्या. त्यांची कामगिरी बघून अजित पवार यांनी जनरेशन नेक्स्टची जबाबदारी कोते पाटील यांच्यावर सोपवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोलीत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना रोजगार हा प्रश्न या परिसरात सर्वाधिक महत्त्वाचा असल्याचे जाणवले, असे त्यांनी सांगितले. चंद्रपुरातही विद्यार्थ्यांसमोर नोकऱ्यांची समस्या आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांना आपले प्राधान्यक्रम बदलावे लागणार आहेत. सर्वांना रोजगार देता येणार नसेल तर किमान विद्यार्थ्यांना त्यांच्याच जिल्ह्यात गृह उद्योगांसाठी प्रेरित करायला हवे. याकरिता काय हवे, काय नको हे सरकारच्या माध्यमातून बघायला हवे. केवळ योजना जाहीर करून यापुढे चालणार नाही. त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात का? नसेल तर अडचणी काय, याचीही खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे कोते पाटील यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विचारणा केली असता, विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार द्यावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा दिसून आली. गोंदियामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आहेत. गडचिरोलीत अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचा परिसरात चांगला जनसंपर्क आहे. याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला निश्चितच होऊ शकतो, असे संग्राम पाटील म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT