Nagpur News : मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. छगन भुजबळ यांनी समता परिषदेचा मेळावा घेऊन थेट शरद पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. त्यांच्या काही वक्त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना समाजासमाजात तेढ निर्माण करू नका, असा सल्ला देतानाच भुजबळ यांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजासाठी काढण्यात आलेला जीआर योग्य वाटतो काय ? यावर उत्तर देताना दादांनी एका पक्षाचा प्रमुख म्हणून कुणाच्याही मागणीला अयोग्य ठरवण्याचे कारण नाही असे सांगून या अडचणीच्या प्रश्नाला खुबीने बगला दिली.
भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आहेत. मंत्री या नात्याने ते महायुती सरकारचाच एक भाग आहेत, असे असताना त्यांनी महायुती सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या शासनादेशावर आक्षेप घेतला आहे.
हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणात घुसखोरी सुरू आहे, त्यामुळे ओबीसीचे नुकसान होत आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे. या जीआर बाबात विचारणा केली असता अजित पवार म्हणाले, 'राज्याच्या प्रमुखानेच याबाबत स्पष्ट केले. कुणाच्या तोंडाचा घास काढून घेण्यात आला नाही. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी नोंद आढळल्यास त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यामुळे ओबीसीचे नुकसान होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले आहे. मात्र यावर भुजबळांचा आक्षेप आहे. यावर ते म्हणाले, कुठलाही निर्णय घेतला तरी त्यावर दोन मतप्रवाह असतात. रोज नव्या चर्चा झडत आहेत. काही पक्ष याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून अजित पवार (Ajit Pawar) यांनी कुणाचेही नाव न घेता काँग्रेसवर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि आणि भुजबळ यांच्या परस्पर विरोधी भूमिकेवर बोलताना अजितदादा म्हणाले, देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याची मुभा आहे. कुणाला काय हवे हे मागण्याची मोकळीक आहे. मात्र लोकशाहीमध्ये सर्वांनुमते निर्णय झाल्यावर तो मान्य करायचा असतो. आमच्या पक्षाची भूमिका कुठल्याच समाजाला नाराज करायचे नाही ही आहे असे सांगून अप्रत्यक्षपणे भुजबळ यांच्या मागणीशी असहमतीसुद्धा दर्शवली.
मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेला जीआर योग्य वाटतो काय? या प्रश्नाला उत्तर देताना दादांनी खुबीने बगला दिली. मी एका पक्षाचा प्रमुख आहे. त्यामुळे कुठलीही मागणीला अयोग्य म्हणण्याचे कारण नाही. प्रत्येकाला मागणी मागण्याचा अधिकार आहे. आमचा प्रयत्न कुणालाही आरक्षण देताना कायद्याची चौकट पाळली गेली पाहिजे, न्यायालयात ते टिकले पाहिजे आणि दुसऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे असेही यावेळी अजितदादांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.