Maratha Reservation Sarkarnama
विदर्भ

Akola Maratha News : ...तर जिल्ह्यात मंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावू, सकल मराठा समाजाचा प्रशासनाला इशारा !

जयेश विनायकराव गावंडे

Akola Maratha Andolan Political News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातही सकल मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. (Manoj Jarange Patil again started food giving up movement)

अन्नत्याग, पुढाऱ्यांना गावबंदी यांसह विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. आज (ता. ३०) सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर मंत्र्यांनी अकोला जिल्ह्यात येऊ नये, अन्यथा कार्यक्रम उधळून लावण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचं लोण आता संपूर्ण राज्यात पसरायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यासह राज्यातील कानाकोपऱ्यात पसरत आहे. विदर्भातही या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे.

अकोला जिल्ह्यातही आता सकल मराठा समाज आंदोलनात उतरला आहे. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीसह अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात मराठा समाजाने प्रशासनाला इशारा दिला असून जिल्ह्यात मंत्र्यांचा दौऱ्याला विरोध करण्यात आला आहे.

काय आहे निवेदनात?

अकोला जिल्ह्यातील गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना आवश्यक त्या वैद्यकीय उपचार शासनाने पुरवावे , त्यांचा जीविताला धोका झाल्यास पूर्ण जबाबदारी शासनाची राहील. तसेच त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी. तर मंत्र्यांना जिल्हा बंदी करण्यात येणार आहे. आमदारांनासुद्धा गाव बंदी केली आहे.

पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत जिल्ह्यात येऊ नये, अन्यथा त्यांचे कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा निवेदनात देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्री आणि पालकमंत्री यांना कुठल्याही शासकीय व अशासकीय कार्यक्रमाला बोलावू नये आणि त्यांनी मंत्री व पालकमंत्री यांना न येण्याचा सल्ला द्यावा. मराठा समाजाच्या तीव्र भावना समजावून घेऊन त्यांनी उपयोजना कराव्यात. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी विनायकराव पवार, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, कृष्णा अंधारे, प्रदीप चोरे, धनंजय दांदळे, शंतनु वसु , सुनिता ताथोड, संजय सूर्यवंशी श्रीकांत, प्रफुल्ल देशमुख, प्रदीप लुगडे, गणेश गिराम, धीरज देशमुख, काशिनाथ पटेकर, माधुरी वाघमारे, रश्मी पटेकर, डॉ अमोल रावणकार, अनुराधा ठाकरे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT