Panjabrao Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Akola Panjabrao Deshmukh: डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : भारताच्या कृषी विकासात डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. अशात त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्रातून पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासंदर्भात आपणही केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, देशाच्या विकासात कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.

कृषी क्षेत्रासाठी जे भरीव योगदान डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दिले, ते विसरता येऊ शकत नाही. डॉ. देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. ही मागणी रास्तही आहे. आपण केंद्र सरकारला याबाबत विनंती करणार आहोत. डॉ. देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा, यादृष्टीने प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉक्टरेट पदवी जाहीर झाल्यानंतर काही लोकांकडून फडणवीस यांची थट्टा केली जात आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी टीका करणारे करीत राहतात, त्याकडे फारसे लक्ष द्यायचे नसते असे नमूद केले. प्रत्येकाने आपापले काम करीत राहावे.

टीकाकारांच्या प्रत्येक विषयाकडे लक्ष देत बसलो तर कसे होणार, अस प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुतीचे सरकार प्रयत्न करीत आहे. देशातील सर्वच शेतकऱ्यांचे भले व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार काम करीत असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

यशोमती ठाकूरही सरसावल्या

डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि तिवसा विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनीही केली आहे. अमरावती येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबाबत सरकारने पाठपुरावा करावा, अशी भावना व्यक्त केली.

अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार अॅड. ठाकूर यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी डॉ. देशमुख यांना भारतरत्न मिळावा, यासाठी एकजुटता दाखवावी, असे आवाहन केले. त्याचवेळी अकोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न देण्याबाबत भाष्य केल्याने हा विषय केंद्र सरकारपर्यंत पोहोचणार असल्याचे मानले जात आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT