Akola City
Akola City Sarkarnama
विदर्भ

Akola riots : ९० पेक्षा जास्त लोकांना अटक, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर; तणावपूर्ण शांतता !

मनोज भिवगडे

Akola riots News : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका संदेशावरून शनिवारी (ता. १३) रात्री जुने शहरातील हरीहरपेठ परिसरात दोन समाजांत झालेल्या वादानंतर आता दोन दिवसांनी अकोला शहरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. (Necessary precautions are being taken by the police)

शनिवारी रात्री घडलेल्या घटनेस जबाबदार असणाऱ्या ३०० पेक्षा अधिक नागरिकांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, आज सोमवारी (ता. १५) सायंकाळपर्यंत ९० पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयातही हजर करण्यात आले. संचारबंदीतही आज शिथिलता देण्यात आली.

अकोला शहरात जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी रात्री दोन समाजात वाद झाले. दगडफेक व जाळपोळीत एकाच मृत्यू झाला होता, तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. सात ते आठ घरांची जाळपोळ करण्यात आली. अनेक गाड्या पेटवून देण्यात आल्या. थरकाप उडविणाऱ्या या घटनेत पोलिसांचे अपयश अधोरेखित झाले.

रात्री २.३० वाजतानंतर पोलिसांना हल्लेखोरांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतर तातडीने अकोला शहरातील चार पोलिस स्टेशनच्या हद्दीत कलम १४४ नुसार जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. सोबतच संचारबंदीही लावण्यात आली होती. आता संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे.

शहरातील चार पोलिस स्टेशन्सच्या हद्दीत १३ मेपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले. दोन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी मागे घेण्यात आली आहे, तर दोन पोलिस स्टेशनच्या हद्दीत रात्रीची संचारबंदी कायम आहे. जमावबंदीचा आदेश मात्र कायम आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) दिलेल्या आदेशानुसार सिटी कोतवाली व रामदासपेठ पोलिस (Police) स्टेशन हद्दीत लावण्यात आलेली संचारबंदी निर्बंध हटविण्यात येऊन जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अकोला (Akola) जुने शहर व डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीत संचारबंदी शिथिल करून आजपासून (ता. १५) सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. १५ मेच्या रात्री ८ ते १६ मेच्या सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ता. १६ मेपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ८ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदी आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT