Ambadas Danve News : Sarkarnama
विदर्भ

Ambadas Danve News : कायद्याची पायमल्ली करत विधानसभा अध्यक्ष निकाल देतील, दानवेंचा दावा !

Atul Mehere

Nagpur Political News : आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना स्पष्ट सूचना दिली आहे. या सूचनांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पालन करावे, असे अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी म्हणजे प्राधिकरणासमोरील एक सुनावणी आहे. विधानसभा अध्यक्ष ही अथॉरिटी नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले. (Assembly Speaker is not an authority)

गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता. २३) रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नागपूरला पुराचा तडाखा बसला. पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अंबादास दानवे आज (ता. २६) नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कायद्याची पायमल्ली करत विधानसभा अध्यक्ष निकाल देतील. विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, अशी अपेक्षा आहे.

नागपूरसारख्या स्मार्ट शहरामध्ये इतका भीषण पूर येणे म्हणजे लाजिरवाणी बाब असल्याचे दानवेंनी सांगितले. केंद्र व राज्यातील अनेक बडे नेते मूळ नागपूरकर असताना या स्मार्ट शहरात पूर परिस्थिती का निर्माण झाली, याचा विचार होणे गरजेचे आहे. राज्यातील सत्ता संघर्षाबाबत बोलताना दानवे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे कठोर पालन करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देणे अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्षांचे काम आहे अस्तित्वात असलेल्या कायद्याचा अर्थ लावून न्यायनिवाडा करणे.

विधानसभा अध्यक्ष स्वतंत्र अथॉरिटी नाही. त्यामुळे त्यांनी मनमानी पद्धतीने निकाल देऊ नये, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदारांच्या मुद्द्यावर जो निकाल द्यायचा तो द्यावा. हा निकाल कदाचित आपल्या बाजूने लागेल किंवा आपल्या विरोधातही लागेल असे होऊ शकते. परंतु देण्यात येणारा निकाल हा संविधान व कायद्याच्या चौकटीत असावा, असे दानवे म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचे लक्षात आल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सुनावणीचे निश्चित वेळापत्रक मागून घेतले. त्यानंतरही निकालाची निश्चित तारीख अध्यक्षांना सांगता येत नाही, ही बाब दुर्दैवी आहे. सुनावणीची प्रक्रिया कशी असावी, हे ठरविण्यातच विधानसभा अध्यक्ष सध्या गुंतले आहेत. हा गुंता त्यांनी लवकर सोडवावा, अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्ली येथे गेले होते. दिल्लीत ते कोणाला भेटले, काय चर्चा झाली, या संदर्भात खुलासा झाला पाहिजे. सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. अध्यक्षांवर भाजपचा प्रचंड दबाव आहे का, याची माहिती घेणे गरजेचे आहे. हा दबाव असेल तर संविधानातील तरतुदी व कायद्याची पायमल्ली करत विधानसभा अध्यक्ष निकाल देतील, यात दुमत नसल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT