Prakash Ambedkar and J.P. Nadda Sarkarnama
विदर्भ

Ambedkar - Nadda News : ...तर आपणही नड्डांचे स्वागत केले असते, असं का म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

जयेश विनायकराव गावंडे

Ambedkar - Nadda News : भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी (ता.21) रोजी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृहा'ला भेट दिली होती. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, नड्डा यांच्या भेटीची आणि वेळेची पूर्वकल्पना दिली असती तर आपण निश्चितच राजगृहावर त्यांना भेटलो असतो. कारण घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करावं, अशी आपली संस्कृती आहे.

आज (ता. 22) प्रकाश आंबेडकर माध्यमांशी बोलत होते. जे. पी. नड्डा यांच्या राजगृह भेटीनंतर आंबेडकर म्हणाले, आज जे संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. त्यांना शेवटी आपली बाबासाहेब आंबेडकरांवर आस्था असल्याचं दाखवावे लागत आहे. आज आंबेडकर यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला होता. त्यानंतर 39 मुद्द्यांचा मसुदा वंचितकडून महाविकास आघाडीला देण्यात आला होता.

27 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीसंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले, 27 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचे आपल्याला निमंत्रण नाही. मात्र, या बैठकीत जर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं जागावाटप झालं, तर त्यानंतर आपण या तिन्ही पक्षांशी जागावाटपावर चर्चा करू. आपण कोणतीही वेळेची मर्यादा महाविकास आघाडीसाठी घालून दिली नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. आपण महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेबद्दल निर्धास्त असल्याचे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षण हे रस्त्यावरच्या लढाईने तुम्हाला मिळणार नाही. ते जर मिळवायचे असेल तर जरांगे पाटील यांना लोकसभेमध्ये जावे लागेल आणि त्यासाठी जरांगे पाटील यांना निवडणूक लढवावी लागेल, असे आवाहन आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांना केले होते. आज पुन्हा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, असं आवाहन केलं आहे.

जरांगे पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, असेही आंबेडकर म्हणाले. ते या निवडणुकीत निवडूनदेखील येतील, असा विश्वास या वेळी आंबेडकरांनी व्यक्त केला आहे, तर जरांगेंना राजकीय भूमिका घ्यावीच लागेल. तरच त्यांचा दबाव गट निर्माण होईल. निजामी मराठ्यांनी जसं अण्णासाहेब पाटील, पुरुषोत्तम खेडेकरांना संपवलं. अगदी तसंच जरांगेंच्या बाबतीत होऊ शकतं. म्हणून त्यांनी सावध असावं, असे आंबेडकर म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT