Navneet Rana controversy Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana controversy : नवनीत राणा यांचा भाजपमधून नायनाट करा! मुख्यमंत्र्यांना 22 जणांनी पत्रच धाडलं; फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष!

Amravati Election: BJP 22 Defeated Candidates Seek Navneet Rana Expulsion : अमरावती महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवनीत राणा यांच्या हकालपट्टीची मागणी केली.

Pradeep Pendhare

Amravati Municipal Election : अमरावती महापालिकेत भाजपच्या संख्याबळात प्रचंड घट झाली आहे. निवडणुकीत पराभूत 22 उमेदवारांनी याचं खापर युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर फोडलं आहे.

यासंदर्भात पराभूत 22 उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, नवनीत राणांवर रोष व्यक्त करत, त्यांचा भाजपमधून नायनाट करा, अशी मागणी केली आहे. पराभूत 22 उमेदवारांच्या या पत्रानं खळबळ उडाली असून, यावर मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेणार का? याकडे आता लक्ष लागलं आहे.

अमरावती महापालिकेच्या 87 जागांमध्ये भाजपला (BJP) 25, खालोखाल काँग्रेस 14, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 16, युवा स्वाभिमान पक्ष 10, 'AIMIM' 15, एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष 1, इतर 3 जागेवर विजयी झाले आहेत.

अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा देखील पराभव झाला आहे. यासह साईनगर प्रभागात मुख्यमंत्र्यांच्या जवळचे समजले जाणारे, आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय हे देखील पराभूत झाले आहे.

या प्रमुखांच्या पराभवासह भाजपच्या 22 उमेदवार पराभूत झाले असून, त्यांनी याचं खापर नवनीत राणांवर फोडत, नाराजी व्यक्त केली आहे. नवनीत राणांनी निवडणुकीत पक्षाविरोधी भूमिका घेतल्याने, त्यांना पक्षातून निलंबित करावं, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या पत्रात 22 उमेदवारांनी बरंच काही लिहिलं आहे.

भाजपत राहून भाजपचाच काटा

पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे, आम्ही भाजपचे निष्ठावंत, परिश्रम करणारे व समाजाशी नाळ जुळलेले उमेदवार होतो. या मनपा निवडणुकीत आमचा पराभव विरोधी पक्षाने नव्हे, तर भाजपच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी करून केला आहे. भाजपत राहून भाजपचाच काटा काढण्याचे काम नवनीत कौर राणा यांनी केले, असल्याने त्यांचे पक्षातून निष्कासन करण्यात यावे, अशी आमची पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे.

राणांनी भाजप संघटना घरी बसवली

नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपचे गढ असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनेल वर वरवंटा कसा फिरवला जाईल, याचे नियोजन केले. एकीकडे भाजपच्या सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत राणा यांनी डॉ. धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली. डॉ. धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहर भर केला. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपच्या विरोधात प्रचारात उतरल्या.

राणाच्या प्रचारानं भाजप मतदार संभ्रमित

भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार लयलूट केली. आमच्या प्रभागात मतदारांवर प्रचंड दबाव उभा केला. नवनीत राणा स्वतः भाजपच्या नेत्या असल्याने त्यांनी भाजप पदाधिकारी सोबत घेतले आणि त्यांनी आमच्या पराभवासाठी कंबर कसली. मोहल्ल्या मोहल्ल्यात, प्रत्येक नगरात कडाडून भाषणे, प्रचार रॅली काढून आमच्या उमेदवारीविषयी जनतेत संभ्रम उभा केला. आम्ही जिथे लोकांना भेटलो तिथे लगेच नवनीत राणा जाऊन आमच्या भाजपच्या प्रचारावर पोछा मारत होत्या. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आम्हाला आशीर्वाद असल्याचे आणि तेच पाठीशी असल्याचे राणा दाम्पत्य खुलेआम सांगत होते. भाजपचे मतदार या प्रचाराने संभ्रमित झाले.

उमेदवारांना योजनापूर्वक पाडलं

आम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार रवी राणा यांचे झोकून देऊन काम केले. पण नवनीत राणा यांनी जाहीरपणे आम्हालाच गद्दार ठरवून आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याना उद्ध्वस्त केले. भाजपच्या प्रभावक्षेत्रात भाजपला मूठमाती देऊनच राणा दाम्पत्याने मनपा निवडणुकीत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. पत्नीला 'स्टार प्रचारक' भाजप नेता दर्शवून भाजप उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचे काम राणा दाम्पत्याने केले.

भाजप वाचवा, विनंती...

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात राणा दाम्पत्य फिरकले देखील नाही. तिथे भाजप कमी करण्याची छुपी व्यूहरचना त्यांनी आखली. आम्ही हरलो. पराभव आम्हाला मान्य आहे. पण आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी कमळ हातात घेऊन पक्षाशी गद्दारी करून केला. भविष्यात भाजपचा सुपडा साफ होऊ नये, म्हणून कळकळीने आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती करतो की एखादा पराजय झाला तरी चालेल पण यांच्या नादी लागून पक्ष संपवू नका. तात्काळ नवनीत राणा यांना युवा स्वाभिमान पक्षासाठी मोकळे करा. यांनी अशीच राष्ट्रवादी काँग्रेस संपवली होती. राकाँला पुन्हा पक्ष उभा करायला दहा वर्ष लागले. भाजप वाचवा ही आमची विनंती आहे. आमच्या पैकी काही सहकारी विजयी झाले आहेत. पण त्यांना हरवण्यासाठी देखील नवनीत राणा यांनी कसून प्रयत्न केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT