Amravati News: बदलीचा आदेश होऊनही ३८ शिक्षकांना दोन वर्षांपासून कार्यमुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील २०२४ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप ‘रिलीव्हिंग’ मिळालेले नाही; मात्र त्यानंतर बदली झालेल्या काही शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील शिक्षकांच्या बदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०२४ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्याचवेळी २०२५-२६ मध्ये बदली झालेल्या काही शिक्षकांना मात्र कार्यमुक्त करण्यात आल्याने आधी बदली झालेल्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नव्या शिक्षकांची नियुक्ती बदली झालेल्यांच्या जागी करावी, अशी मागणी कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
शिक्षण अधिकाऱ्यांकडून मागील दोन वर्षांपासून शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण पुढे करून २०२४ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांना मेळघाटातून कार्यमुक्त करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप शिक्षकांकडून होत आहे. मात्र आता पोर्टलच्या माध्यमातून नवीन शिक्षक उपलब्ध होत असतील तर त्यांची नियुक्ती मेळघाटातील रिक्त जागांवर करण्याऐवजी आधीच बदली आदेश झालेल्या शिक्षकांच्या जागी करावी, त्यामुळे एकीकडे मेळघाटातील शिक्षकांची कमतरता भरून निघेल आणि दुसरीकडे दोन वर्षांपासून बदलीनंतरही कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी जाता येईल.
चिखलदरा तालुक्यात २०२४-२५ मध्ये बदली झालेले १५ शिक्षक, तर धारणी तालुक्यात २३ शिक्षक अद्याप मेळघाटातून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यातील अनेक शिक्षक मागील दहा-बारा वर्षांपासून मेळघाटात कुटुंबापासून दूर राहून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. बदली झाल्यानंतरही कार्यमुक्ती न मिळाल्याने कुटुंबापासून दूर राहण्याची त्यांची अडचण कायम आहे.
जिल्ह्यात नवीन शिक्षणाधिकारी रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांनी दोन वर्षापासून कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या २०२४ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या भावना समजून घेऊन या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. पोर्टलवरून नियुक्त होणाऱ्या नवीन शिक्षकांना प्रथम २०२४ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी नियुक्त करावे आणि त्या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करून मेळघाटातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आता चिखलदरा व धारणीतील संबंधित शिक्षकांनी केली आहे.
शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील शिक्षकांना कार्यमुक्त केले. मात्र ज्यांच्या पाठीशी कोणी नाही, अशा शिक्षकांना अद्याप प्रतीक्षेत ठेवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप २०२४ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांमुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोर्टलच्या माध्यमातून नवीन शिक्षकांची नियुक्ती मेळघाटात करण्यात येत आहे. मेळघाटतील ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांचा विचार निश्चितपणे करण्यात येईल. होणाऱ्या नियुक्त्या या नियमानुसारच करण्यात येतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.