Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Nagpur Stampede : चेंगराचेंगरीवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख संतापले

Atul Mehere

Nagpur Stampede : उपराजधानीतील सुरेश भट सभागृहात चेंगराचेंगरी झाल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तीन महिला जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी नागपूर भाजपविरुद्ध जबाबदारी निश्चित करीत पोलिस कारवाई करण्याची मागणी माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे. शनिवारी (ता. 9) रेशीमबाग परिसरात असलेल्या सुरेश भट सभागृहात स्वयंपाक घरात लागणाऱ्या साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कामगार कल्याण विभागाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात नोंदणीकृत श्रमिकांना हे साहित्य वाटप केले जाणार होते. त्यामुळे शनिवारी पहाटेपासूनच सुरेश भट सभागृहाच्या परिसरात प्रचंडी गर्दी झाली होती.

गर्दीवर नियंत्रण नसल्याने व कोणतेही नियोजन नसल्याने सुरेश भट सभागृहात गोंधळ उडाला. या गोंधळात चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा बळी गेला. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपने केले होते. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावर बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, नागपुरात जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. भाजपच्यावतीने सुरेश भट सभागृहाच्या आवारात कामगारांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर घेण्यात आले होते. शिबिर आयोजित करताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शुक्रवारीच (ता. 8) महिला दिन साजरा करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एका महिलेचा मृत्यू होणे दु:खदायक आहे. पोलिसांचा बंदोबस्त सुरेश भट सभागृहात नव्हता. या घटनेची जबाबदारी भाजपने घेतली पाहिजे. भाजपच यासाठी जबाबदार आहे. ज्या भाजपच्या नेत्यांनी हे शिबिर आयोजित केले होते, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. कार्यक्रम भाजपचा होता परंतु कामगार कल्याण मंडळाचे कामकाज बंद करून कर्मचारी शिबिराच्या ठिकाणी होते. प्रचार भाजपचा सुरू होता. अशात कोणतीही काळजी न घेतल्यानं महिलेचा जीव गेल्याचा संताप अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाबाबत लगेच बोलता येणार नाही. त्यांच्याबाबत तीनही पक्षाचे नेते ठरवतील काय करायचे ते. त्यानंतर याबाबतची भूमिका जाहीर केली जाईल. ज्या पक्षाकडे सक्षम उमेदवार असेल त्यालाच योग्य जागा दिली पाहिजे, असा फार्मुला आहे. कोणाला किती जागा मिळेल हे उगाच बोलण्यात यात तथ्य नाही, असे अनिल देशमुख म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसला वर्धा मतदारसंघ मिळायला हवे अशी इच्छा आहे. पक्षाने आदेश दिल्यास आपण वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्याशी योग्य चर्चा झाली आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येईल, असा विश्वास आहे, असेही देशमुख म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT