Anil Deshmukh's Statement on Krupal Tumane's Accusation on Ajit Pawar : राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विदर्भातील अकोल्यापासून सुरू झालेले दंगलीचे लोण आता कोल्हापूरपर्यंत जाऊन पोहोचले आहे. कधी कधी कर असं वाटतं की सरकारलाच दंगली घडवायच्या आहेत की काय, या शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. (The government wants to create riots)
आज सकाळी (ता. ७) देशमुख नागपुरातील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. अनेकदा कानावर येते निवडणुकीपूर्वी दंगली घडवून आणायच्या, लोकांच्या भावना भडकवायच्या आणि त्याचा फायदा घ्यायचा, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. जनतेने असे प्रयत्न हाणून पडावे, सत्ताधाऱ्यांच्या या डावाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
नागपूर शहरात शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी काही नियुक्त्या केल्या. या नियुक्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी विरोध केला आहे. या नियुक्त्यांवर फेरविचार व्हावा, अशी विनंती कुंटे पाटलांनी वरिष्ठ नेत्यांना केली आहे. याबाबत विचारले असता, पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. नियुक्त्यांवरून वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. चर्चेतून यावर तोडगा काढता येईल. हा काही तेवढ्या काळजीचा विषय नाही, असे देशमुख म्हणाले.
राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सभ्य, सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते आहेत. काय टिका करायची ती त्यांनी करायला पाहिजे. पण शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत एकेरी उल्लेख करणे त्यांना शोभले नाही. देशात जे काही ज्येष्ठ नेते आहेत, त्यांमध्ये शरद पवारांचा क्रमांक वरचा आहे. मुनगंटीवारांसारख्या नेत्यांनी तरी असे करू नये, असे अनिल देशमुख म्हणाले.
कृपाल तुमाने यांनी अजित पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे आव्हान स्वीकारावे. ‘५० खोके एकदम ओक्के’ हा गद्दारांचा विषय इतका लोकप्रिय झाला, की लहान मुलांनाही तो माहिती झाला आहे. तुमानेंनी आपले आरोप सिद्ध करावे, असे आव्हान त्यांनी खासदार तुमानेंना दिले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना देशमुख म्हणाले, ४० आमदारांना सांभाळण्याचे काम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करत आहेत, मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही हे सांगता येत नाही.
शासनाच्या वतीने माध्यमांना ज्या जाहिराती दिल्या जातात हे पाहून हसायला येते. संजय गांधी निराधार योजना आणि रोजगार हमी योजना, या तरुण तरुणींसाठी नाही. तरीही त्यात सुशिक्षित तरुण तरुणी दाखविल्या जातात. रोजगार हमी योजना ६५-७० वर्षांपूर्वी बॅरिस्टर अंतुले यांनी दिली, मजूर वर्ग या योजनेचा लाभ घेतो.
यासंदर्भातल्या जाहिराती व्यवस्थित अभ्यास करून दाखवल्या पाहिजे. जुन्या सरकारच्या (Government) काळातील योजनांच्या जाहिराती कशाला दाखवता. तुम्ही काय नवीन योजना आणल्या, त्या जाहिराती दाखवा ना, असा सल्ला अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्य सरकारला दिला.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.