Nana Patole, Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Nana Patole Vs Ashish Deshmukh : ओबीसींवरून नाना पटोलेंची कोंडी; आशिष देशमुखांचे गंभीर आरोप, म्हणाले...

अभिजीत घोरमारे

Gondia Political News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीविरोधात ओबीसी समाजाने आंदोलन छेडले होते. या आंदोलनावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भाजप नेते आशिष देशमुखांनी चांगलीच कोंडी केली आहे. पटोले हे ओबीसींना विसरले असून, त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम करतात. हायकमांडच्या आदेशामुळे नाना आंदोलनात सहभागी झाले नाहीत, असा आरोपही देशमुखांनी केला आहे. यामुळे नाना पटोलेंची मोठी गोची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याला पटोले काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

भाजपच्या वतीने २ ऑक्टोबरपासून वर्धा जिल्ह्यातून ओबीसी जागर यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा शुक्रवारी गोंदिया जिल्ह्यात पोहाेचली. या वेळी बाइक रॅली काढून यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील जलाराम लॉन येथे ओबीसी जागर सभा पार पडली. या वेळी भाजप नेते (Ashish Deshmukh) आशीष देशमुखांनी नाना पटोलेंवर हल्लाबोल केला.

एकेकाळी जवळचे मानले जाणाऱ्या देशमुखांनीच पटोले यांच्यावर ओबीसीविरोधी असल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. देशमुख म्हणाले, 'नाना पटोले हे ओबीसींच्या कुठल्याही आंदोलनात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे पटोले हे ओबीसींना विसरले आहेत. त्यांनी ओबीसींच्या पोटावर लाथ मारण्याचे काम केले आहे,' असाही गंभीर आराेप माजी आमदार देशमुखांनी केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देशमुखांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या ओबीसींबाबत भूमिकेचीही आठवण करून दिली. 'काँग्रेसने ओबीसींचा द्वेष केला, हे मागील अनेक वर्षांतील त्यांच्या व्यवहारावरून सिद्ध झाले आहे. राजीव गांधींनी मंडल आयोगाला विरोध केला होता. ओबीसी विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्याची संधी भाजपने उपलब्ध करून दिली आहे. आता आंदोलनाला पाठिंबा देण्याची संधी असूनही (Nana Patole) नाना पटोलेंनी ती दवडली. त्यांना तसा वरून आदेश होता,' असेही देशमुख म्हणाले.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. त्यामुळे ओबीसी कल्याणाचे अनेक प्रश्न मार्गी लागले. राज्यात ओबीसींच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली. ओबीसी समाजाचा सर्वांगीण विचार करणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. भाजप ओबीसींचा आणि ओबीसी भाजपचा हा आमचा मूलमंत्र आहे,' असाही दावा आशिष देशमुखांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT