Bacchu kadu
Bacchu kadu Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu Vs Shivsena 'गद्दारी'वरून बच्चू कडू आक्रमक : ‘हमारी खुद की पानटपरी है! कहाँ लगाना है, हम देखेंगे...’

Vijaykumar Dudhale

अमरावती : गुवाहाटीला जावं की नाही, हे कोण ठरवणार? ही पानटपरी (प्रहार संघटना) आमची आहे, त्यामुळे आम्हीच ठरवणार ना. शिवसेनेचा आणि आमचा काय संबंध? हमारी खुद की पानटपरी है! कहाँ लगाना है, हम देखेंगे, त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणून कोणी शहाणपणा शिकवू नये, असा माजी राज्यमंत्री तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व इतर नेत्यांना सुनावले. (Bacchu kadu aggressive against Shiv Sena's allegations)

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची नुकतीच अमरावतीमध्ये जाहीर सभा झाली. त्या सभेत अंधारे यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार प्रहार केले हेाते. त्याला आमदार कडू यांनी आज उत्तर दिले. या वेळी आमदार कडू यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे देत अचलपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच १२६ कोटी रुपयांचा निधी शिंदे सरकारकडून मिळाल्याचे सांगितले.

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले की, गुवाहाटीला जावं की नाही जावं, हे तुम्ही कोण ठरवणार? ही पानटपरी (प्रहार संघटना) आमची आहे, तुमची थोडी आहे. आम्ही ठरवणार ना? आमच्या कार्यकर्त्यांनी २० वर्षे मेहनत घेतली. आम्ही अंगावर केसेस घेतल्या. आम्ही झोडपे खाल्ले लोकांचे आणि तुम्ही सांगणार की आम्ही कोणासोबत बसायचं ते?

शिवसेनेचा आणि आमचा काय संबंध आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या कोणत्याही पक्षाचा आमच्याशी संबंध नाही. आमची स्वतःची मेहनत आहे. हमारी खुद की पानटपरी है! कहाँ लगाना है, हम देखेंगे. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणून कोणी शहापणा शिकवू नये. आम्ही गद्दारी केलेली नाही. आम्ही ठरविणार आहेात, आमच्या पक्षाचं. आमचं ते स्वातंंत्र्य आहे, असेही कडू यांनी स्पष्ट केले.

आम्ही कोठे जायचे आणि कोठे जायचे नाही, हे आम्ही ठरवणार आहेात. माझ्या प्रचाराला सभा घेण्यासाठी उद्धवसाहेब आले होते का? आम्हाला कसे गद्दार म्हणता मग तुम्ही? मनात येईल ते बोलता का, असा सवालही बच्चू कडू यांनी केला.

फिनले मिलसंदर्भात उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत बैठक लावली नाही

फिनले मिलसंदर्भात बच्चू कडूंनी अंधारे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, फिनले मिलसंदर्भातही सुषमा अंधारे यांचा अभ्यास कमी आहे. फिनले मिलच्या वेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी शरद पवार यांनी आम्हाला मदत केली होती. स्वतः आर. आर. पाटील हे दिल्लीला आले होते. त्यावेळी शंकरसिंह वाघेला हे वस्त्रोद्योग मंत्री होते, त्यांना भेटून शिफारसपत्र आणले, त्यावेळी ती मिल सुरू झाली. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी ती मिल बंद पडली. त्यासंदर्भात मी ठाकरेंना भेटलो. केंद्राशी संपर्क साधा. एखाद्या बैठक घ्या. पण त्यांनी बैठकसुद्धा घेतली नाही, असा आरोपही कडू यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT