विदर्भ

Bacchu Kadu : २०२४ मध्येच होणार मंत्रिमंडळ विस्तार, ‘जो जितेगा, वही बनेगा मंत्री’

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu News : मी पहिले कोर्टाच्याच तारखा ऐकत होतो, आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा ऐकत आहो. मी मागितलेले मंत्रालय मिळाले, त्यामुळे किमान माझी तरी सरकारवर काही नाराजी नाही. या सरकारने दिव्यांग मंत्रालय दिले, याचा मनस्वी आनंद आहे. माझ्या बंडखोरीचे यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे, असे प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू नागपुरात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या बंडखोरीचा चांगला विचार केला. माझ्या वाट्याला काय आलं, हे महत्वाचं नाही, तर माझ्या दिव्यांग बांधवांच्या वाट्याला मंत्रालय ही माझ्या आयुष्यातील मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले. निवडणूक आयोग आणि न्यायालय यांचे ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. निकाल येत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं सध्यातरी दिसतंय आणि या निकालानंतरही विस्तार झाला नाही, तर मग तो २०२४च्या निवडणुकांनंतर होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

या विषयावर आम्ही काही चर्चा केली नाही आणि कुणाशी बोललोही नाही. पण सध्या चित्र असं दिसतंय. न्यायालय किंवा आयोगाचा निकाल लागल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, तर तो २०२४च्या निवडणुकांच्या नंतर होईल, असे आपल्याला का वाटते? असे विचारले असता, आता या सरकारची मुदत संपण्यासाठी एक वर्षाचा कालावधी राहिलेला आहे. त्यातलेही शेवटचे सहा महिने निवडणुकीच्या तयारीत जातात. मग थोड्या कालावधीसाठी कशाला करायचा विस्तार? त्यामुळे मग कदाचित नाही करू. आमचे २० मंत्री सक्षम आहेत राज्याचा कारभार चालवण्यासाठी आणि सरकार चांगले निर्णय घेत आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

कुणातही तेवढी ताकत नाही..

थोड्या कालावधीसाठी मंत्रिमंडळ विस्तार करायचा आणि आमदारांची (MLA) नाराजी ओढवून घ्यायची, असा विचार कदाचित कुठेतरी होत असेल. त्यामुळे बहुतेक २०२४च्या निवडणुका झाल्यानंतरच विस्तार होईल, असे वाटते. ‘२०२४ मे जो जितेगा, वो मंत्री बनेगा’, असे बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले. कुणाच्या नाराजीचा काही विषय नाही. कारण एकनाथ शिंदे गट आणि भाजप राजकीय दृष्ट्या मजबूत आहेत. त्यामुळे शिंदे (Eknath Shinde) गटातील आणि भाजपमधील कुणी बाहेर जाईल, अशी स्थिती नाही आणि तशी ताकतही कुणात नाही. मात्र इतर पक्षातील लोक शिंदे गट किंवा भाजपमध्ये येतील, अशी स्थिती आहे, असेही त्यांनी सांगितले.

माझी अट्टाहास कधीही नव्हता..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले, यात आम्ही आनंदी आहो. नाही मंत्रिपद दिले तरीही या मंत्रालयाची सेवा करण्यात आम्ही धन्यता मानू. दिव्यांग बांधवांसाठी आमची कालच बैठक झाली. त्यात चांगले प्रस्ताव तयार करून ते मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. तसंही मंत्री व्हावं, म्हणून माझा अट्टाहास कधीही नव्हता. आम्ही मागून मागून मागितलं काय, तर दिव्यांग मंत्रालय. कारण दिव्यांग बांधवांसाठी मोठे काम करण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचेही आमदार कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT