Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu On Government : मंत्रालयच भ्रष्टाचारी; सहा मजले सुधारले तरी अख्खा महाराष्ट्र सुधारेल !

Atul Mehere

चेतन व्यास

Wardha Political News : आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्या मंत्रालयात बसतात, त्या मंत्रालयाचे सहा मजले जरी भ्रष्टाचारमुक्त केले, तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल, असे ठाम पण तितकेच स्फोटक वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. (Bachu Kadu interacted with the disabled brothers and learned about their problems)

दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वर्ध्यातील सेवाग्राम येथे दिव्यांगाच्या दारी अभियान राबविले जात आहे. या अभियानाची सुरुवात आज (ता. १३) आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी त्यांनी सरकारवर तोफ डागली. सत्ता कोणत्याही पक्षाची असो महाराष्ट्राच्या मंत्रालयामधील भ्रष्टाचार काही केल्या थांबत नाही, असा आरोप नेहमीच होतो. आता या आरोपाला सत्ताधारी पक्षातीलच मंत्र्याचा दर्जा असलेल्या एका नेत्याने दुजोरा दिला आहे.

बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी बच्चू कडू यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ट्रिपल इंजिन सरकारही मंत्रालयातील भ्रष्टाचार थांबवू शकलेले नाही, हे अधोरेखित झाले आहे.

...तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल

'एवढ्या मोठ्या सात मजली मंत्रालयात कालच एका अधिकाऱ्याला झापून आलोय. मंत्रालयाचे सहा मजले जरी सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल, पण पाणी मंत्रालयातच मुरते, तिथेच सगळी चिरीमिरी आहे. जिथे आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव बसतात तिथेच सगळा गोंधळ आहे. बदलीसाठी मंत्रालयात काय काय करावं लागतं, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. लय वांदे आहेत. यात बदल आवश्यक आहे', असं बच्चू कडू यांनी नमूद करीत ट्रिपल इंजिन सरकारला आरसा दाखवला आहे.

राज्याच्या मंत्रालयात किती भ्रष्टाचार असला तरी दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांगांच्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातून शेकडो दिव्यांग बांधव या अभियानात सहभागी झाले आहेत, असे बच्चू कडू यांनी सांगितले. कोणत्याही विभागाचा मंत्री कितीही प्रामाणिक असला तरी मंत्रालयातील अधिकारीच सर्वांच्या चाव्या फिट करतात.

बच्चू कडूंचा संताप

कोणाचं काम कसं, कुठे आणि कधी फिट करायचं हे मंत्रालयातील बाबू, अधिकारी आणि सचिवांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. अनेकांना हटवण्याचा प्रयत्नही झाला. परंतु मंत्रालयातील विशिष्ट खुर्च्यांचा सातबारा घेऊनच हे अधिकारी, बाबू व सचिव गेल्या अनेक वर्षांपासून राज्यकारभार चालवणाऱ्या त्या सहा मजली इमारतीत ठाण मांडून बसले आहेत, असा संतापही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

सत्ता कोणत्याही पक्षाची असो, परंतु एखादे काम मंत्रालयातून करून घ्यायचे असल्यास 'लक्ष्मी दर्शन' केले की कामाच्या फाइल पटापट पुढे सरकतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मंत्रालयात लागलेल्या या भ्रष्टाचाराच्या किडीवर अजूनपर्यंत तरी कायमस्वरूपी 'पेस्ट कंट्रोल' करणारे औषध कोणाला सापडलेले नाही, असेही आमदार बच्चू कडू यांनी नमूद केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT