Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu : बच्चू कडूंचा 'प्रहार'! म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या हत्येचा कट म्हणजे...

अतुल मेहेरे

Nagpur Political News : महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. 'मातोश्री'वरून या कटाची सूत्रं हलली, असा थेट आरोप शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. आमदार गायकवाड यांच्या आरोपांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत विरोधकांवर प्रहार केला आहे. (Latest Political News)

'आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. ही बाब खरी असेल तर ती फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. ही माहिती सत्य असेल तर ती पोलिस आणि तत्सम यंत्रणेकडून तपासली गेली पाहिजे,' असे आमदार बच्चू कडू म्हणाले.

'कार्यकर्ता आणि नेता यांच्यात एक जिवाभावाचे नाते असते. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत घडलेला प्रकार म्हणजे या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार आहे,' असा आरोपही कडूंनी केला. 'एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जर ही घटना घडली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा कलंक लागला असता,' असेही ते म्हणाले.

राजू शेट्टी यांचे म्हणणे ऐकू

'आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही तयार आहोत. सरकारमध्ये असू दे अथवा नसू दे, शेतकऱ्यांसाठी जे करायला पाहिजे ते केल्याशिवाय बच्चू कडू राहत नाहीत. त्याच्या परिणामांची बच्चू कडूला चिंता नाही. विधानसभेच्या आत असू दे किंवा बाहेर शेतकऱ्यांसाठी सतत लढा दिला आहे. सत्तेत असतानासुद्धा शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. त्यामुळे राजू शेट्टी यांची इच्छा असेल तर त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ,' असे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) म्हणाले.

सुविधांपेक्षा पगारावर खर्च जास्त

अपंगांचे सहा महिन्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. सहा महिन्यांत ३३ ते ४० टक्के आरोग्यावर खर्च झाला असेल, तर पगारावर किती झाला आणि रुग्णांवर किती झाला? हा संशोधनाचा विषय असल्याची टीका कडूंनी केली. ते म्हणाले, सरकार कुणाचेही असले तरी आरोग्य, शिक्षणासाठी आम्ही संवेदनशील असले पाहिजे. राजकीय आरोप न करता महाराष्ट्र आरोग्य सुविधांच्या बाबतीत कसा पुढे नेता, येईल यासाठी सर्वांनी चिंतन करावे.' (Maharashtra Political News)

'मागील ७० वर्षांत हीच परिस्थिती आहे. आम्ही सगळेच राजकीय लोक त्यासाठी जबाबदार आहोत. आरोग्य सेवेतील विषमता वाढत आहे. आमदार आजारी पडला तर ५० लाख रुपये खर्च केले जातात. मात्र, सर्वसामान्य माणसासाठी पाच लाख रुपये खर्च होतात,' असा घरचा आहेरही कडूंनी सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मदत

मतदारसंघात १०२ कोटींचा वाटपाचा आकडा असताना ४० कोटी वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वाटपासाठी केलेली व्यवस्था ही टेक्निकली गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे पैसे असतानाही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. ही व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे, अशी मागणी आमदार बच्चू कडूंनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT