Sunil Kedar, Nana Patole, Chandrashekhar Bawankule and others. Sarkarnama
विदर्भ

Bhandara Congress-BJP News : जनसंवाद यात्रा आहे तरी कुणाची? काँग्रेस-भाजपमध्ये रस्सीखेच !

अभिजीत घोरमारे

Bhandara District Political News : भंडारा जिल्ह्यात भाजप आणि कॉंग्रेस पक्षात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हा वाद जनसंवाद यात्रेवरून निर्माण झाला आहे. आपलाच हक्क पुढे करत भंडारा जिल्हा काँग्रेस आणि जिल्हा भाजपमध्ये जनसंवाद यात्रेवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनसंवाद यात्रा नेमकी आहे तरी कुणाची, असा प्रश्‍न जनसामान्यांना पडला आहे. (Competition has started between the two parties to reach the voters' door first)

निवडणुका तोंडावर आल्यामुळे सर्वच पक्ष लोकाभिमुख होण्यासाठी तत्पर आहेत. सध्या राज्यासह जिल्ह्यातही भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये एकाच गोष्टीची चढाओढ लागली आहे, ती म्हणजे लोकांपर्यंत आधी कोण पोहोचणार? एकमेकांवर कुरघोडी करीत मतदारांच्या दारात सर्वप्रथम पोहोचण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

यात एका नव्याच वादाने तोंड वर काढले आहे. जिल्ह्यात भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) पक्ष 'जनसंवाद यात्रा' आमचीच असे सांगत आहेत. दोन्ही पक्ष आमची जनसंवाद यात्रा दुसरा पक्ष हायजॅक करू पाहतोय, असे ठामपणे बोलत आहेत. त्यामुळे आता 'जनसंवाद यात्रा' नेमकी आहे कोणाची, यावरून वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या जिल्ह्यात (Bhandara) राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे वेळापत्रक (अनधिकृत) आले असून, लवकरच निवडणूक लागणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आत्तापासूनच तयारीला लागा व लोकांपर्यंत पोहोचा असा फतवा पक्षश्रेष्ठींकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घर घर चलो अभियान, जनसंवाद यात्रा, जनसंपर्क यात्रा, लोकमिलन यांसारख्या कार्यक्रमांना ऊत आला आहे.

भाजपकडून जनसंवाद यात्रा, तर काँग्रेसची संवाद यात्रा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसने सर्वप्रथम जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. भाजप आमच्या जनसंवाद यात्रेची कॉपी करत असल्याचेही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. याउलट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यात जनसंवाद यात्रेचा प्रारंभ केला आणि जनसंवाद यात्रा आमचीच, असा दावा केला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनीही यासंदर्भात कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली आहे. त्यामुळे आता यात्रेवरून राजकीय वातावरण पेटणार का, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, दोन्ही पक्ष जनसंवाद करण्यासाठी चढाओढ करीत असताना राष्ट्रवादीचा शरद पवार गट कसा मागे राहील? येत्या १३ सप्टेंबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार यांचा दौरा आखण्यात आला आहे.

रोहित पवारांची जाहीर सभाही आयोजित केली जाणार आहे. या सर्व राजकीय घडामोडी लक्षात घेता आतापर्यंत घरात बसून असलेले सर्व नेते थेट लोकांच्या दारात दिसत आहेत. एरवी लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी वेळ नसणारे नेते आता वेळ काढून लोकांशी संवाद साधण्यासाठी धडपडत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT