Bhaskar Jadhav in Gondia. Sarkarnama
विदर्भ

Gondia : भास्कर जाधव आले आणि आघाडीत बिघाडी लावून गेले

अभिजीत घोरमारे

Shiv Sena : लोकसभा निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच गोंदिया दौऱ्यावर येऊन गेलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आघाडीच्या धर्म न पाळता गोंदिया विधानसभेवर शिवसेना (UBT) गटाची हक्क वजा दावेदारी केली आहे.

जाधव यांच्या या दाव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटणार आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गोंदिया विधान सभेवरून आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलतानाच हा दावा केल्यानं त्यावर चर्चा सुरू झालीय.

आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले की, यापूर्वी गोंदिया विधानसभा मदार संघामध्ये शिवसेनेचे वर्चस्व होते. दोनदा गोंदिया विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे. मध्यंतरी विश्वासघाताने शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यात आले. तेव्हापासून ‘प्लान’ करत काँग्रेसचा उमेदवार दोन निवडून आला. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी आहे. सद्धा गोंदिया विधानसभा मतदार संघ हा अपक्ष आमदाराकडे आहे. मात्र आता या मतदार संघातील मतदारांचा मूड शिवसेनेचा असल्यामुळे तो शिवसेनेकडे राहणार आहे. शिवसेनाच या मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भास्कर जाधव यांना किती गांभीर्याने घेतात असा प्रश्न निर्माण झालाय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंडल आयोगावरून चिमटा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंडळ आयोग माहिती तरी आहे काय? जेव्हा मंडल आयोगाची स्थापना झाली, तेव्हा फडणवीस जन्माला तरी आले होते का? असा सवाल करीत त्यांनी फडणवीस यांना चिमटा काढला. प्रत्येक समाजाला खोटे आश्वासन देण्याचं काम फडणवीस करीत असल्याचं ते म्हणाले. धनगर समाज, लिंगायत समाज आणि मराठा समाजाला त्यांनी किती वेळ प्रलोभन दिलय. सत्ता आल्यावर ते आरक्षण देणार होते. परंतु दिलं नाही. 2014 मध्ये फडणवीस यांनी विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असं जाहीर केलं होतं. त्याचं काय झालं, अशी आठवणही जाधव यांनी करून दिली.

कोण कुठले सामंत?

मतदार संघातील कामांवरून भास्कर जाधव यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. कोण कुठले सामंत? ते कोण कामं थांबविणारे असा सवाल जाधव यांनी केला. ज्या कामांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सरकारने मंजुरी दिली होती. ती कामं शिंदे-फडणवीस सरकारने थांबविली होती. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर ही कामं सुरू झाली आहे. सामंत असं बोलले असतील तर त्यांचा समाचार घेऊ असंही ते म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT