Congress and BJP  Sarkarnama
विदर्भ

Amravati Pattern : दिल्लीत तलवारी आणि गल्लीत यारी; अमरावतीत भाजप-काँग्रेसची युती!

सरकारनामा ब्यूरो

Amravati : भाजपचा एक नंबरचा राजकीय शत्रू म्हणून काँग्रेसकडं पाहिलं जातं. तसेच भाजपकडून अनेकदा काँग्रेसमुक्त भारतचे नारेही दिले जात आहेत. तसेच दुसरीकडे काँग्रेसच्या राहुल गांधींनी भाजप विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ते लवकरच मातोश्रीवर उध्दव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. याचवेळी अमरावतीहून राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणालाही हादरा देणारी एक बातमी समोर आली आहे.

अमरावतीच्या वरुड बाजार समितीत चक्क भाजपची कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेससोबत युती झाली आहे. आणि विशेष म्हणजे काँग्रेससह महाविकास आघाडीवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडे(Anil Bonde) यांच्या कृपाशीर्वादानेच ही युती घडली असल्याचं समोर येत आहे.

उध्दव ठाकरेंनी २०१९ ला भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीसह घरोबा करत सत्तास्थापन केली होती. यावरुन भाजपकडून शिवसेनेवर नेहमीच घणाघाती टीका केली जाते. सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याचा आरोपही करण्यात येतो. मात्र, आता भाजपनंच काँग्रेससोबत युती केली आहे. यामुळे ठाकरे गटाला भाजपला कोंडीत पकडण्याची आयती संधी मिळाली आहे.

भाजप खासदार अनिल बोंडे यांनी वरुडच्या बाजार समितीत ही युती घडवून आणली आहे. काँग्रेसच्या नरेशचंद्र ठाकरे यांच्या बाजूने ते लढणार आहेत. बोंडे यांनी थेट काँग्रेसच्या एका गटासोबत हातमिळवणी केल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या निर्णयामुळे अमरावतीचं राजकारण ढवळून निघणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या युतीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच स्थानिक काँग्रेसने असा निर्णय घेण्याची गरज नव्हती असंही म्हटलं आहे.

वरुड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. येत्या 30 एप्रिल रोजी या वरुड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत 54 उमेदवार रिंगणात आहेत. 20 एप्रिलनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

वरूड बाजार समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे. गेल्या दहा र्षापासून काँग्रेसचीच वरूड बाजार समितीत सत्ता होती. त्या आधी राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुख गटाचीही सत्ता होती. तर काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांनीही बाजार समितीत दहा वर्ष सत्ता आहे.

मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. याचवेळी भाजपलाही स्थानिक गटबाजीनं पोखरलं आहे. बोंडे हे काँग्रेसच्या ठाकरे यांच्या बाजूने प्रचार करणार आहेत. तर काँग्रेसच्या गिरीश कराळे गटाने राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुख गटाशी युती केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT