Ashok Chavhan & Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Amravati : ‘इंडिया’ मजबूत होत असल्यानेच भाजपकडून संभ्रम निर्माण केला जातोय

Amar Ghatare

Congress Meeting : ‘इंडिया’ आघाडी दररोज मजबूत होत आहे. त्यामुळे भाजपकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. वेगवेगळ्या खेळी त्यांच्याकडून खेळल्या जात आहे. भाजपच्या या खेळीला फार महत्त्व नाही, असे ठाम मत काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने अमरावती येथे आले असता त्यांनी गुरुवारी (ता. 18) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशात सर्वत्र सध्या संभ्रम निर्माण करण्याच्या गोष्टी सुरू आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल, तशा अनेक गोष्टी वाढणार आहेत. वंचित बहुजन अघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेतले पाहिजे अशी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी यावे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय पातळीवर त्यांना ‘इंडिया’ आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही अशोक चव्हाण यांनी नमूद केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने आधी आपल्या सीमा पाहिल्या पाहिजे. आपल्या सीमावर्ती भागात लक्ष दिले पाहिजे तेथे सोयीसुविधा पोहोचविल्या गेल्या पाहिजे. कर्नाटकने केलेले वक्तव्य चुकीचे नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. याबाबत बोलाताच चव्हाण यांनी स्पष्ट केले की, अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा काँग्रेससोबत निवडून आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये उडी मारली. त्यांनी काँग्रेसला विचारत घेतले पाहिजे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांनी बरीच मोठी मदत केली आहे, याचे स्मरणही त्यांनी राणा यांना करून दिले. भाजपसोबत गेल्यावर नवनीत राणा आणि रवी राणांची काय अवस्था झाली आहे, हे लोकांना माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीमधील अन्य पक्षांवर आपण काहीही बोलणार नाही. काँग्रेस पक्षाची भूमिका महाविकास आघाडीबाबत स्पष्ट आहे. काँग्रेस या भूमिकेबाबत ठाम असल्याचेही चव्हाण म्हणाले. श्रीरामाची पूजा आम्ही दररोज करतो. श्रीराम हे फक्त भाजपची मक्तेदारी नाही. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजप केवळ राजकारण करीत आहे. मंदिरात जाण्यासाठी सर्वच दिवस शुभ असतात. असा कोणताही एखादा मुहूर्त शुभ आणि बाकी दिवस अशुभ असे दर्शन घेण्याबाबतीत नसते, असे चव्हाण यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत भाजपने कितीही प्रयत्न केला तरी काँग्रेस देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT