MLA Ashish Jaiswal
MLA Ashish Jaiswal Sarkarnama
विदर्भ

आमदार जयस्वालांच्या माणसांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजप नेत्याचा आरोप...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे यांनी ९ जुलैला नागपुरात (Nagpur) पत्रकार परिषद घेऊन रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० जुलैला आमदार जयस्वाल यांच्या इशाऱ्यावरून आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप डॉ. राजेश ठाकरे यांनी केला आहे.

१० जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास मी आपल्या घरासमोर उभा असताना अंधारातून दोन युवक आले आणि ‘आमदार साहाब के विरोध मे बोलना बंद करो, नही तो बहुत महंगा पडेगा’, असे म्हणून धमकी दिली. आमदार जयस्वाल यांच्या इशाऱ्यावरूनच धमकी दिली गेली असल्याचे राजेश ठाकरे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. आमदार जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) लोकांची कामे करीत नाहीत. केवळ स्वतः आणि आपल्या कार्यकर्त्यांना कमाई करवून देण्यात ते गुंतले आहे. खनिकर्म महामंडळातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार मी गेल्या काही दिवसांपासून जनतेसमोर मांडत आहे. त्यामुळे ते मला संपवण्याच्या मागे लागले असल्याचेही ठाकरे म्हणाले.

डॉ. राजेश ठाकरे यांनी आमदार जयस्वाल यांच्यावर मातीमिश्रित वाळूच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. आमदार आशिष जयस्वाल हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी मातीमिश्रित वाळूच्या व्यवहारात १५० कोटींचा घोटाळा केला आहे. भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये, म्हणून अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी डॉ. ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आमदार जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व कागदपत्रे पुराव्यासह त्यांना पाठवले आहेत.

आमदार जयस्वाल यांचा रामटेक तालुक्यातील खनिज संपत्तीवर डोळा आहे. खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना तब्बल १५० कोटींचा गैरव्यवहार जयस्वाल यांनी केला आहे. खनिज विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तेचा दुरुपयोग केला आहे. खिंडसी ते वैनगंगा वाहत असलेल्या सूर नदीतील रेती उपसता यावी, यासाठी जयस्वाल यांनी गरिबांच्या घरांसाठी मातीमिश्रित वाळूच्या नावावर परवानगी मिळवली होती. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली होती. यापूर्वीसुद्धा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आ. जयस्वालवर ३०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यावरून चौकशीस सुरुवात झाली होती, परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती चौकशी बंद केल्याचा आरोपही डॉ. ठाकरे यांनी केला.

ईडी चौकशी करावी..

आमदार आशिष जयस्वाल यांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार केला आहे. त्यांनी कोट्यवधींची जमीन विकत घेतली आहे. त्यांनी नातेवाइकांच्या नावाने संपत्ती घेतली आहे. त्यामुळे त्यांची ईडी चौकशी करण्यात यावी. तसेच सीबीआयनेही आमदार जयस्वाल यांची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. राजेश ठाकरे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT