Anil Deshmukh and Dr. Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh News : आशिष देशमुखांचा आता मूड बदलला; निवडणूक लढणार नाही असे म्हणता म्हणता थेट...

Rajesh Charpe

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या काही दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पक्षातून त्या पक्षात राजकीय उड्या मारण्यात पटाईत असलेले भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण यंदाची विधानसभेची निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, आता त्यांचा मूड आता बदलल्याचे दिसत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोणी पराभूत केले होते, आताही त्यांना कोण पराभूत करू शकतो याचा विचार करा आणि तुम्‍हीच सांगा भाजपमधून काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळायला हवी अशी विचारणा करून ते लढण्याचे संकेत देत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीपासून आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आपले संपूर्ण लक्ष काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर केंद्रित केले आहे. सध्या या मतदारसंघात जागोजागी त्यांचे पोस्टर झळकू लागले आहे. या मतदारसंघातील सर्व घडामोडींवर ते बारिक लक्ष ठेऊन आहेत. संत्रा बागयतदारांचा जिल्हा असल्याने त्यांनी अलीकडेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन या भागातील संत्रा, मोसंबी, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी मांडल्या.

काटोलमध्ये प्रस्तावित पीकेव्हीचे उधानविद्या महाविद्यालय, घोषित झालेले सिट्रस इस्टेट सुरू करण्याची मागणी केली. संत्रा बागांमध्ये फळ गळती होत असल्याने हेक्टरी मदत द्यावी आणि बाजारातील मोसंबी कट पद्धत बंद करावी, अशी मागणी त्यांनी कृषिमंत्र्यांकडे केली. या माध्यमातून ते काटोलवरची आपली दावेदारी भक्कम करीत असल्याची चर्चा आहे.

मूळचे काँग्रेसी असलेल्या देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नात्याने काका असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, भाजपच्या नेत्यांसोबत त्यांचे फारसे जुळले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही त्यांनी बंडाचे निशान फडकावले. आपल्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन केले. मात्र, कोणीच दखल देत नसल्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आतच देशमुखांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते.

काँग्रेसने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांना निवडणूक लढण्यास सांगितले होते. पराभूत झाल्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तोफ डागणे सुरू केले. राहूल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी असे जाहीर सांगून वाद ओढावून घेतला. त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करून काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबित केले. यानंतर त्यांनी पुन्हा भाजपच्या नेत्यांसोबत सूत जुळवले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी केले. प्रवेशाच्यावेळी त्यांनी आपण विधानसभेची निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले होते. आता मात्र त्यांच्या हालचाली बघता ते पुन्हा काटोलच्या रिंगणात काका विरुद्ध दंड थोपटणार असल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT