Vijay Wadettiwar and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Sana Khan Murder Case : सना खान प्रकरणात नागपुरातील भाजप नेते, गृहमंत्री फडणवीसांना पत्र देणार !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Political News : बहुचर्चित सना खान खून प्रकरणात जबलपूरचे आमदार संजय शर्मा यांची चौकशी झाल्यानंतर यामध्ये नागपुरातील काही भाजप नेते असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. चौकशीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले. (Will give letter to Home Minister Devendra Fadnavis for inquiry)

नागपुरात काल (ता. २५) पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, या प्रकरणात कॉंग्रसचे जबलपूरचे आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी उघडपणे तर भाजपच्या लोकांना गुपचूप बोलवले जात आहे. या प्रकरणात सत्ताधाऱ्यांशी संबंधित अनेक नावे आहेत. अनेक मोठे नेते या प्रकरणाशी जुळले असल्याचा आरोप त्यांनी केला. सना खान खून प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेत केंद्र व राज्य सरकारने चौकशी करावी.

यावेळी त्यांनी जापान दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. फडणवीस मुख्यमंत्री म्हणून जापानला गेले असते नक्कीच महाराष्ट्रासाठी काही आणले असते. परंतु उपमुख्यमंत्री म्हणून ते राज्यासाठी काही आणतील, असे वाटत नाही, असे ते म्हणाले. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत विचारले असता त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील, असे सांगितले.

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा अधिकार आहे. ते १६ आमदार वाचणार नाहीत. पुढील निवडणुकीत आम्ही जिंकणार, असा दावा करीत त्यांनी कुणी धांदल केली तरच निकाल वेगळे लागतील. निवडणुकीत भाजपकडून घातपाताची शंकाही व्यक्त केली. विविध सर्व्हेक्षणात ‘इंडिया’ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असूनही काही उपयोग नाही. इशारा इशाऱ्यांत काम सुरू आहे, असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

शरद पवारांचे वक्तव्य स्ट्रॅटिजीचा भाग..

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी अजित पवार आमचेच नेते, असे वक्तव्य केले. याबाबत वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू होईल म्हणून त्यांच्या स्ट्रॅटिजीचा तो भाग असू शकतो. प्रत्येक पक्षात काम करताना अनेकदा शेवटच्या क्षणी फूट पडते, त्यावर ते आपला प्लान बी तयार ठेवतात. कोण कुठे जाते हे निवडणुकीत स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

भाजपची लोकप्रियता संपुष्टात..

स्वार्थामुळे अनेक जण बरबटलेले आहे. निवडणुकीतच (Election) चित्र स्पष्ट होईल आणि ‘इंडिया’च्या पाठीशी लोक असतील. आता भाजप (BJP) सरकारची लोकप्रियता संपली, भाजपने राजकारण नासवले आहे, असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. ज्यांनी जनतेचा विश्वासघात केला, त्यांना जनता जागा दाखवेल आणि हे निवडणुकीच्या मैदानात स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT