Akola Flyover Sarkarnama
विदर्भ

BJP MLA Sawarkar News : अभियंत्याला झापताच भुयारीमार्ग सुरू; आमदार साहेब, आता त्या ‘झंडू’लाही झापा...

जयेश विनायकराव गावंडे

Akola City Political News : कोट्यवधी रुपये खर्चून अकोला शहरात उड्डाणपुलांसह भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र, काहीच महिन्यांत उड्डाणपुलासह भुयारी मार्गही कूचकामी ठरला. भुयारी मार्गात पाणी साचल्याने गेल्या काही महिन्यांपासून हा मार्ग बंदच होता. मात्र, उशिरा का होईना भाजपच्या आमदारांना या भुयारी मार्गाची दखल घ्यावीशी वाटली, हेही नसे थोडके… (The subway has started, but the Akolekars are asking what about the flyover)

आमदार रणधीर सावरकर यांनी थेट महामार्ग अभियंत्यांना व्हिडिओ कॉल करत चांगलेच धारेवर धरले. काही वेळातच या भुयारी मार्गातील पाणी काढण्यात आले आणि हा मार्ग आता वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. भुयारी मार्ग सुरू झाला मात्र उड्डाणपुलाचे काय, असा प्रश्न अकोलेकरांकडून विचारला जात आहे. अकोला शहरातील मध्यवर्ती भागात कोट्यवधी रुपये खर्चून तीन वर्षांत दोन उड्डाणपूल उभारण्यात आले.

या पुलावरून २८ मे २०२२ पासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, शहरातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्यांच्या आत क्षतिग्रस्त झाला. आता गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने पुलावरून अमरावतीकडे जाणारी वाहतूक बंद आहे.

उड्डाणपूल बंद असल्याने शहरातील वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी या पक्षांसह या पुलासाठी आंदोलन करीत शासन व प्रशासनावर टीका केली, तर हा उड्डाणपूल तत्काळ दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लोटला अद्यापही हा पूल बंदच आहे, तर याचप्रमाणे भुयारी मार्गाचेही तसेच हाल आहेत.

पावसाळा सुरू झाल्यापासून या ठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होती. त्यापूर्वीही येथून पाणी काढण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने हा मार्ग अधूनमधून वाहतुकीसाठी बंद राहतो. याबाबत नागरिकांकडून टीका झाल्यानंतर अखेर आमदार रणधीर सावरकर यांनी स्वतः थेट अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्याजवळ जात महामार्ग अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. अनेकदा सांगून देखील अधिकारी काम करीत नसल्यामुळे त्यांनी महामार्ग अभियंत्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

अवघ्या काही तासांतच याची दखल घेत भुयारी मार्गातील पाणी काढण्यात आले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र बंद असलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे ‘आमदार साहेब आता उड्डाणपुलाकडेही बघा अन् ‘झंडू कन्स्ट्रक्शन’च्या अधिकाऱ्याला झापून हाही पूल तेवढा सुरू करा, अशी आर्जव अकोलेकरांनी केली आहे.

उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अकोल्यात..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उद्या (ता. २९) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिवार फेरीच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. गडकरींनीच या पुलाचे लोकार्पण केले. त्यामुळे त्यांच्याकडून अकोलेकरांना अपेक्षा आहेत. त्यांनी हा उड्डाणपूल बघावा आणि याची दखल घ्यावी, अशीही आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT