Sanjivani Gote, Alliput, Wardha. Sarkarnama
विदर्भ

Buldana Samruddhi Mahamarg Accident : ध्येयवेड्या संजीवनीच्या आयुष्यासह स्वप्नंही होरपळली...

सरकारनामा ब्यूरो

संजीवनी शंकर गोटे ही तरूणी काल (ता. ३० जून) वर्धेहून विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये पुण्याला जाण्यासाठी बसली. तेव्हा तिच्या डोळ्यांत आणखी उंच भरारी घेण्याचे स्वप्न होते.. कारणही तसंच होतं... तिला पुण्याच्या एका कंपनीत नोकरी लागली होती.

बस जसजशी पुढं जात होती, तसतशी संजूची (संजीवनी) उत्सुकता वाढत होती. दरम्यान ती कुटुंबीयांसोबत आणि मैत्रिणींशी फोनवर बोलतही होती. बस यवतमाळ आणि तेथून पुढे निघाली आणि कारंजाला जेवण्यासाठी थांबली. त्यानंतर बस समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) येऊन पुन्हा पुण्याकडे मार्गस्थ झाली. तेव्हा संजीवनीनेच काय कुणीच कल्पनाही केली नव्हती की, हा प्रवास अखेरचा ठरणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिपळखुटा शिवारात बसचा अपघात झाला आणि बस उलटली आणि पेट घेतला. हा अपघात येवढा भीषण होता की, २५ प्रवाशांचा जागीच कोळसा झाला. त्यामध्ये संजीवनीचाही समावेश होता. बघता बघता नव्हे, तर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मागील वर्षी शिक्षण पूर्ण करून आयुष्यातील पहिली नोकरी करण्यासाठी निघालेल्या संजीवनीच्याच नव्हे, तर तिच्या कुटुंबीयांच्याही स्वप्नांचा कोळसा झाला.

शेगावमध्ये घेतले शिक्षण..

संजीवनीची बाल मैत्रीण राणी ऊर्फ अश्विनी कांबळे हिने ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले की, आम्ही पाचव्या वर्गापासून सोबत शिकलो. वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या हिंगणाघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील यशवंत हायस्कूलमध्ये १०वीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर संजीवनीने बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीचे शिक्षण (इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलीकम्यूनिकेशन) पूर्ण केले आणि राणीने वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची (कम्प्युटर सायन्स) पदवी घेतली.

गावातून जाताना ती फार आनंदी होती. आमचा एक ग्रुप होता. १०वीनंतर पुढील शिक्षणासाठी सर्व मैत्रिणी इकडे तिकडे गेल्या. राणी सांगत होती… त्यानंतर असंच एखाद्या सुटीत सर्वांची भेट व्हायची. तेव्हा आम्ही सर्व मिळून खूप धम्माल करायचो. एक दिवसापूर्वीच तिचं आणि माझं बोलणं झालं होतं. मी जॉईन केल्यानंतर सुटी घेऊन येईन मग आपण सर्व मैत्रिणी मिळून मज्जा करू, असं ती बोलली होती. पण.... हे सांगताना राणीला हुंदका आवरला नाही.

नियतीला मंजूर नव्हते..

मागच्या वर्षी तिने शिक्षण पूर्ण करून काही क्लासेसमधून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तिला पुण्याच्या एका कंपनीत चांगली नोकरी मिळाली. तेथे रुजू होण्यासाठी काल संजीवनी घरून निघाली होती. आज त्या कंपनीत तिचे जॉईनिंग होते. पण... नियतीला ते मंजूर नव्हते, असे संजीवनीच्या शेजारी राहणाऱ्या प्रतिभा वानखडे यांनी सांगितले.

चुलही पेटली नाही..

संजीवनीचे वडील शंकरराव एलआयसी एजंट आहेत आणि आई गृहिणी आहे. मोठी बहीण तनुश्री आणि लहान भाऊ मोहित, सर्व जण अल्लीपूरलाच राहतात. त्यांना तर या घटनेचा इतका धक्का बसला आहे की, ते बोलून शकत नव्हते. आता ते घटनास्थळाकडे रवाना झालेले आहेत. या अपघाताची बातमी गावात पोहोचताच गावावर शोककळा पसरली. हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावाची संजीवनी गेल्यानंतर आज गावात चुलही पेटली नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT