Buldhana District APMC
Buldhana District APMC Sarkarnama
विदर्भ

Buldhana District APMC: बाजार समित्यांमध्ये आघाडीचा डंका अन् सत्ताधाऱ्यांना धोक्याची घंटा !

अरूण जैन

Buldhana District APMC Election Results Analysis : बुलढाणा जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या १० बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये सात जागांवर आपला डंका वाजविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे; तर सत्ताधारी आमदारांना रायमुलकर यांचा अपवाद वगळता या निवडणुकीने सणसणीत चपराक दिली आहे. (Mahavikas Aghadi has won a resounding victory)

एक प्रकारे सत्ताधाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आणि काँग्रेससह महाविकास आघाडीला उभारी देणारे निकाल लागले आहेत. जिल्ह्यातील १० बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडली. बाजार समितीमध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाले. तरीही बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, खामगाव, शेगाव, नांदुरा व जळगाव जामोद या बाजार समितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे.

जिल्ह्यात कुठे काँग्रेस, कुठे राष्ट्रवादी काँग्रेस, तर कुठे शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) बाजी मारली आहे. तर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) केवळ मलकापूर, मेहकर व लोणारमध्ये विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीसाठी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, खामगावचे आमदार आकाश फुंडकर, जळगाव जामोदचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर या सत्तेतील आमदारांनी सर्व प्रयत्न करून आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.

सर्वसामान्यांचा कल कळला..

मेहकरचा अपवाद वगळता इतर एकाही आमदाराला अपेक्षित यश मिळू शकले नाही. राजकीय परिस्थितीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात जो सत्तासंघर्ष सुरू आहे, तो जनतेला आवडला की नाही? हे समजण्यासाठी एखादी निवडणूक होणे गरजेचे होते. सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अडवून ठेवल्या असल्याने सर्वसामान्य माणसाचा कल लक्षात येत नव्हता. तो विरोधात गेल्याने बाजार समित्यांच्या या निवडणुकीने सत्ताधाऱ्यांसाठी निश्चितच धोक्याची घंटा वाजवली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली दिशा..

मोठ्या प्रमाणावर अर्थकारण करूनही सामान्य जनतेला सत्तेतील मंडळीला सहकार्य करावे का वाटत नाही? याचे उत्तर शोधण्याची वेळ आता निश्चितच आलेली आहे. शिवसेनेतील पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा गट सैरभैर झाला होता. सर्वसामान्य माणूस आपल्याला सोबत आहे की नाही? हे समजायलाही मार्ग नव्हता. परंतु या निवडणुकीने त्यांना निश्चित दिशा दिली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिवात जीव नक्कीच आला असणार.

दुसरीकडे काँग्रेसचीही अवस्था फारशी चांगली नव्हती. नेते कसेबसे तग धरून असले तरी जनता आपल्या सोबत आहे की नाही? हे नक्की काय ते कळत नव्हते. परंतु एकजुटीने प्रयत्न केले व सर्वजण सोबत राहिलो तर निश्चित विजय मिळवू शकतो, हा विश्वास आता काँग्रेसच्या नेत्यांनाही आला असेल.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलायचे झाल्यास डॉ. राजेंद्र शिंगणे हे एकमेव सर्वमान्य नेतृत्व जिल्ह्यात आहे. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील देऊळगाव राजा बाजार समिती सोबतच लगतच्या चिखली, बुलढाणा व शेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत लक्ष घातल्याने त्यांनाही अपेक्षित यश मिळाले आहे. संतनगरी शेगाव तर एक हाती राष्ट्रवादीने मारली. तुलनेमध्ये सत्ताधाऱ्यांकडे साम, दाम, दंड, भेद सर्वकाही असतानाही लागलेला निकाल निश्चितच भविष्यातील चिंता वाढविणारा ठरेल, यात शंका नाही.

घंटा, उभारी, धीर आणि बळाचा संदेश..

एकंदरीतच बाजार समित्यांच्या निवडणूक (APMC Election) निकालाने सत्तेमध्ये आपण काहीही करू शकतो या धुंदीमध्ये मस्त असलेल्या सत्ताधाऱ्यांना धोक्याची घंटा, सत्ता गेल्याने हतबल झालेल्या काँग्रेसला (Congress) उभारी, मोठ्या फुटीमुळे सैरभैर झालेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला धीर, राष्ट्रवादीच्या (NCP) नेतृत्वाला बळ आणि एकजुटीने पुढील निवडणुका लढल्यास नक्की यश मिळेल, हा संदेश दिला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT