Chandrakant Khaire, Bacchu Kadu and Eknath Khadse
Chandrakant Khaire, Bacchu Kadu and Eknath Khadse Sarkarnama
विदर्भ

चंद्रकांत खैरे म्हणाले, बच्चू कडूंनी आता माघार घेऊ नये, तर खडसे म्हणतात, शिंदेंनाच माहीत!

Atul Mehere

नागपूर ः अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. इतर नेतेही आता या वादावर बोलू लागले आहेत. बच्चू कडूंनी आता माघार घेऊ नये, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) यांचे नाव न घेता म्हणाले, ती खासदार बाई खूप टरटर करत होती. पण आता बच्चू कडूंनी (MLA Bacchu Kadu) चांगला संघर्ष उभा केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या परिवाराबद्दल जे कुणी वाईट बोलतील, टिका टिप्पणी करतील, ते कधीही यशस्वी होणार नाहीत. बच्चू कडू मूळ शिवसैनिकच आहेत आणि आजही त्यांचा तोच बाणा कायम आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यांची भूमिका योग्य आहे आणि हीच भूमिका घेऊन त्यांनी पुढे जावे. अर्धवट सोडू नये, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

एकनाथ खडसे म्हणाले, शिंदेंनाच माहीत..

यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडूंनी खोके घेतली की रवी राणांनी घेतले, याचे उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील. खोके देणे-घेणे याचा व्यवहार शिंदेंच्या हातून झालेला दिसतोय. या विषयाची वस्तुस्थिती राणा, बच्चू कडू किंवा एकनाथ शिंदेंनाच माहिती असू शकते, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे आमदार बच्चू कडू यांचे समर्थन केले आहे. तर वर्षानुवर्षे मेहनत करून आज येथे आलो आहे. एक नव्हे तर चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. आज कुणाच्या आरोपाने अस्तित्वच धोक्यात येत असेल तर बाकी गोष्टींना काही अर्थ उरत नाही. त्यामुळे लढाई आर-पारची करू, असे बच्चू कडू म्हणाले.

१ नोव्हेंबरला कोणता बॉम्ब फुटणार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या आहेत. त्यानंतरही राणांचे आरोप सुरूच होते. त्यांना सांगूनही ते ऐकत नव्हते. म्हणून मी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांना इशारा दिला. माझ्याकडे पर्याय नव्हता. असे ते म्हणाले. गुवाहाटीला जाऊन आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. पैसे दिले असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे सांगावे किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी तरी तसा खुलासा करावा, असे कडू यांनी सांगितले आहे. कडू यांच्या मागणीनंतरही एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या विषयावर काही बोलत नाहीये. म्हणून या संघर्षाचे गूढ वाढत चालले आहे. आता १ नोव्हेंबरला बच्चू कडू कोणता बॉम्ब फोडणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT