Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama
विदर्भ

मुख्यमंत्री म्हणाले... संजय राठोडांचा विषय माझ्यावर सोडा

सरकारनामा ब्यूरो

यवतमाळ : बंजारा समाजाला भेडसावणार्‍या समस्या व त्यांच्या अडचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऐकल्या. शनिवारी 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बंजारा समाजाचे मंहत व नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

बंजारा समाजाचे अनेक प्रश्‍न आहेत. त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळ मागण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी बंजारा समाजातील मंहत व नेत्यांना शनिवारी (ता.18) चर्चेसाठी बोलविले होते. या बैठकीला पोहरादेवी येथील मॉ जगदंबा संस्थान व संत सेवालाल महाराज या गादीचे ज्येष्ठ महंत बाबूसिंगजी महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितू महाराज, शंकर पवार आदी उपस्थित होते.

या बैठकीत राज्य व देशपातळीवर बंजारा समाज नेतृत्वहीन झाल्याची खंत व्यक्त केली. आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याने समाजाची राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीवर मंहत व नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. डोंगरदर्‍यात वास्तव्य करणारा हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रश्‍न सोडविण्याची मागणी मंहतांनी केली.

पुणे पोलिसांनी गेल्या एक-दीड वर्षात सर्व बाजूंनी सखोल चौकशी केली. सर्व संबंधितांचे जाबजबाब नोंदवून घेतले. या चौकशीतून जे सत्य समोर आले, ते शासनाने गॅझेटमध्ये प्रसिद्ध केले आहे. त्यावरही कुणाचे आक्षेप नाहीत. ही आत्महत्या मुलीने स्वतःच्या मर्जीने केलेली. आत्महत्याच होती, हेही स्पष्टपणे त्यात नमूद केले गेले. त्यामुळे संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी एकमुखी मांगणी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या शिष्टमंडळात महंत शेखर महाराज, महंत रायसिंग महाराज, संत जेतालाल व सामकीयाडी उमरीचे महंत यशवंत महाराज, जिल्हा बँकेचे संचालक राजुदास जाधव, प्रा. प्रेम राठोड, प्रा. किशोर राठोड, नवलकिशोर राठोड, पांडुरंग राठोड आदींचा समावेश होता.

आमदार संजय राठोड यांना माझ्या मंत्रिमंडळात घेतले तेव्हा कोणी माझ्याकडे आले नव्हते. तशी गरजच नव्हती. पुणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत सत्य समोर आले आहे. त्यामुळे पक्षासाठीही हे चांगले झाले. सर्व गैरसमज दूर झालेत. त्यामुळे आता या प्रकरणात संजय राठोड यांना न्याय कसा द्यायचा, ते माझ्यावर सोडा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पोहरादेवी येथील विकास प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येण्याचे निमंत्रण स्वीकारल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिष्टमंळाला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT