Congress Public Meeting at Nagpur. Sarkarnama
विदर्भ

Nagpur : नागपुरातील काँग्रेसमधील महारॅलीच्या आधीचा गोंधळ नेमका कुणामुळे?

Atul Mehere

Congress Politics : मोदी-शाह यांच्या भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या सिंहासनावरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने नागपूर येथील महारॅलीतून शक्ती दाखविण्याचा निर्धार केला आहे. नागपुरातील महारॅलीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खरर्गे, खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह देशभरातील दिग्गज काँग्रेस नेते हजेरी लावणार आहेत.

अशात ज्या विदर्भात काँग्रेसची ताकद वाढू शकते, तेथे महारॅलीपूर्वी निर्माण झालेल्या या महागोंधळामुळे शक्तीपात होऊ शकतो. यासाठी काही जण प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याकडे बोट दाखवित आहेत, तर काही पटोले विरोधी गटाच्या कार्यशैलीकडे.

नागपुरातील महारॅलीला सुमारे 10 लाखांची उपस्थिती असावी, यासाठी प्रदेश काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रयत्नांना काहींनी आरोप करीत सुरूंग लावण्यासाठी पावले टाकली आहेत. उपराजधानीतील ज्या ठिकाणी ही महारॅली होत आहे, तेथे केवळ 50 हजार लोक बसू शकतील एवढेच मैदान असल्याचा मुद्दा पक्षांतर्गत राजकारणामुळे जाणाीवपूर्वक पुढे आणला जात आहे.

10 लाखांचे लक्ष्य प्रदेश नेतृत्व डोळ्यापुढे ठेऊन असताना ही सभा कशी घाईघाईत होत आहे, हे दाखवून देण्याचाही प्रयत्न काहींनी चालविला आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त जी महारॅली होत आहे, तशा स्वरुपाच्या आयोजनाची तयारी करण्यासाठी साधारणपणे महिना ते सव्वा महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु प्रदेश काँग्रेसने कमी दिवसात जास्त काम करून दाखविण्याचे आव्हान स्वीकारले. असे असतानाही खुपच कमी वेळ मिळाल्याचा मुद्दा रेटला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व त्यांच्या भोवती असणाऱ्या लोकांकडून या आयोजनाकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप आता केला जात आहे. अवघ्या एका दिवसावर सभेचे आयोजन आले असताना सभेच्या पाच दिवस अगोदर बैठक घेत कामांची जबाबदारी वाटण्यात आल्याचाही आरोप होत आहे. मल्लीकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा हे एकाचवेळी महाराष्ट्राच्या भूमित येत आहेत. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना विरोध करणाऱ्या गटाने त्यांना बदनाम करण्यासाठीचा या संधीचे कसे सोने करता येईल, याचा जोरकस कारभार चालवल्याचे दिसत आहे. एकूणच या प्रकामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसते आहे.

काँग्रेसच्या पंजातील नेतृत्वाची बोटे देशात केव्हाच विखुरली आहेत. त्यामुळे लोकसभा काय आणि विविध राज्यातील विधानसभा काय, जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये पक्षाची पिछेहाट झाली आहे. अशात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुकण्यात येत आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसने नागपूर शहराची निवड केली आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये अध्यक्ष आमदार नाना पटोले यांची चांगलीच पकड आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची चांगलीच चलती आहे. अशात आयती संधी आलेली बघत पटोले विरोधकांनी त्यांची पकड सैल करण्यासाठी पक्षाचा पंजाच छाटण्याचा प्रकार चालवल्याची कुजबूज ‘भारत जोडो’ मैदानावर ऐकायला मिळाली.

नागपुरात होत असलेल्या महारॅलीतील नियोजन किती ढिसाळ आहे, हे काही विरोधक ओरडून सांगत आहेत. अगदी पक्षाच्या वरिष्ठ पातळीपर्यंत ही बाब पोहोचावी यासाठीच सारा जोर लावला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही महारॅली प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार नाना पटोले यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि भाजपचा गड म्हणून नागपूरकडे पाहिले जाते.

अशात काँग्रेसच्या स्थापनादिनाचे निमित्त साधत याच शहरात महारॅली घेण्यामागे नक्कीच मोठे राजकारण दडलेले आहे. परंतु पक्षाशी काही देणेघेणे नसलेल्या प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी एकमेकांना उघडे पाडण्यातच धन्यता मानने सुरू केले आहे. प्रदेशाध्यक्षांवर कुरघोडी करण्याच्या नादात ते पक्षाला आतून पोखरत आहेत, याचे भानही त्यांना यामुळे शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत या गोंधळाचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT