Maharashtra political rally 2025 : 'ऑपरेशन सिंदूर' राबवून मोदी सरकारने पाकिस्तानात घुसून दशहतवाद्यांची अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. सोबत देशातील लोकांची मने जिंकून पॉलिटिकल मायलेजही घेतलं आहे.
या ऑपरेशनचे फक्त भाजपलाच सर्व क्रेडिट मिळू नये याकरिता काँग्रेसने जय हिंद यात्रा जाहीर केली आहे. आता त्यास भाजपच्यावतीने तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. हे बघता आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये 'यात्रायुद्ध' रंगणार असल्याचे दिसून येते.
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या पाच दिवसात भाजपच्यावतीने तीन हजाराच्यावर तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येणार आहे. पालकमंत्री, संपर्क मंत्री यांच्या नेतृत्वात या यात्रा काढण्यात येणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला ऊर्जामय करून संपूर्ण देशवाती सैन्याच्या पाठिशी असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
देशाच्या तिरंग्याला विजयी करण्यासाठी आम्ही सर्व सैनिकांच्या पाठीशी आहोत. तिरंगा यात्रेत भाजप महायुतीचे (Mahayuti) सामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकारी, नेते तसेच लोकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. एवढेच नव्हे तर माजी सैनिकांनाही सोबत घेतले जाणार आहे. त्यांच्या पुढाकाराने यात्रेचे नियोजन केले जाणार आहे. भारतीय नागरिक म्हणून देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी उभे राहाणे, त्यांना प्रोत्साहन देणे, धैर्य निर्माण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
यात्रेच्या सोबत सोबतच देशभक्तीपर कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जाणार आहेत. पहिली यात्रा नागपूरमधील लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौक या दरम्यान सकाळी आठा वाजता काढली जाणार आहे. यात सहा ते सात हजार लोकं सहभागी होणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि स्वतः चंद्रशेखर बावनकुळे सहभागी होणार आहेत.
तत्पूर्वी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्यावतीने आपले सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित करून पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकाराला संपूर्ण समर्थन जाहीर केले आहे. सोबतच 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी करणाऱ्या सेनेचे मनोबल वाढवण्यासाठी जय हिंद यात्रा जाहीर केली आहे. सध्या देशाची परिस्थिती राजकीय हेवेदावे दूर ठेवण्याची आहे. ही वेळ आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही. आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात 'जय हिंद' यात्रा काढण्यात येणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.