Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : महाराष्ट्रातील मराठी पक्षांना गुजरातमार्गे पळविले जात आहे

संदीप रायपूरे

Chandrapur Politics : अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले आहे. या मुद्द्यावरून शरद पवार गट आक्रमक झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांना धारेवर धरले होते. आता काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मराठी पक्षांना गुजरात मार्गे पळविले जात असल्याचा घणाघात केला आहे. मराठी माणसांना एकमेकांशी लढवत त्यांचा पद्धतशीरपणे वापर केला जात असल्याचे ते म्हणाले.

वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात गुरुवारी (ता. आठ) माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जोपासत आपल्या राजकीय पक्षांना एका वेगळ्या उंचीवर पोहचविले. मात्र काहींना मराठी लोकांचा होत असलेला विकास बघवत नाही. त्यामुळे ते षडयंत्र करीत सुटले आहेत. शिवसेना फोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून अजित पवारांना आपल्या गटाकडे वळविले आहे, असे ते म्हणाले. NCP Crisis in Maharashtra

बदलती राजकीय संस्कृती अतिशय घातक असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या पळवापळवीच्या राजकारणावर प्रहार केला आहे. आधी राज्यातील अनेक महत्त्वाचे उद्योग गुजरातकडे पळविण्यात आले. आता तर येथील राजकीय पक्षांना ते गुजरात मार्गे पळवित असल्याचा घणाघात त्यांनी केला. मराठी संस्कृतीचा एक वेगळा इतिहास राहिला आहे. त्यांचा राजकीय इतिहास हा देखील स्वाभीमानाचा आहे. पण आता त्यांना फोडून, एकमेकांशी लढवून महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंकित केले जात आहे. येथील पुरोगामी विचारांची जनता भापजला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

शरद पवार यांनी म्हटले की, मराठी माणसांनीच मराठीशी दगा केला, ते अगदी खरेआहे. एकमेकाच्या विरोधात उभे राहून मराठी माणूसच संपला आहे. त्याचा परिपूर्ण फायदा भाजपची मंडळी घेत आहे. मराठी पक्षांना नेस्तनाबूत करण्याचे काम भाजप सातत्याने करीत आहेत. अशावेळी आता मराठी माणसांनी पेटून उठण्याची गरज असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले. मराठी पक्षांत फूट पाडून त्याचा पूर्ण फायदा घेतला जात आहे. मराठी माणसांना लाचार बनवून त्यांचा अभिमान गहाण ठेवला जात आहे. आजपर्यत अनेक मराठी पक्षाबाबत हेच धोरण विरोधकांनी ठेवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तोडा-फोडा आणि राज्य करा ही नीती अवंलबविली जात आहे. मराठी माणसांची राजकारणात होत असलेली अगतिकता ही चिंतनीय आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. पळवापळवीचे हे धोरण आपली अस्मिता संपवू बघत आहे. हे अतिशय धोकादायक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT