Vijay Wadettiwar & Nana Patole. Sarkarnama
विदर्भ

Nagpur : महारॅलीच्या माध्यमातून परिवर्तनाची मुहूर्तमेढ उपराजधानीतून रोवली जाणार

Atul Mehere

Congress : काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात होत असलेल्या महारॅलीच्या माध्यमातून देशात परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आयोजनावर बोलताना ही आशा व्यक्त केली.

नागपूर येथे तीनही नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधना ही महारॅली राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला. भाजपच्या कार्यप्रणालीवही या नेत्यांनी जोरदार टीका केली.

नागपूरशी जुने नाते

काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी त्यांच्या भाषणात नेहमी उल्लेख करायच्या की, नागपुरात आल्यानंतर त्यांना आनंद होतो. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. देशाच्या राजकारणात, समाजकारणात, स्वातंत्र्याच्या चळवळीत नागपूरची मोलाची भूमिका होती. त्यामुळे महारॅलीचे आयोजन निवडणुकीच्या अनुषंगाने आहे, असा समाज करून घेऊ नये. निवडणूक होत राहतात. परंतु भारतीय राज्यघटनेसमोर भाजपसारखे आव्हान कधीच निर्माण झाले नव्हते. ते आज निर्माण झाला आहे, असे काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक म्हणाले.

संसदेत मणिपूरसारख्या विषयांवर चर्चा होत नाही. लोकसभेत घुसखोरी होते. तरुण उड्या मारतात. या सुरक्षेच्या प्रश्नावरही गृहमंत्री चर्चा करत नाहीत. अशा पद्धतीचे वागणे लोकशाहीसाठी पोषक नाही, असे ते म्हणाले. ‘इंडिया’ आघाडीत पंतप्रधानपदाचा चेहरा कोणता असेल, यावर चर्चा करण्यात येईल. एखादी निवडणूक जिंकणे आणि पराभूत होणे यावरून कोणाला प्रमाणपत्र देता येऊ शकत नाही. यंत्रणेचा गैरवापर भाजपकडून होत आहे. निवडणूक जिंकल्याने लोकांचा विश्वास प्राप्त केला आहे, हे यातून सिद्ध होत नाही असे वासनिक म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटेकरांना गंभीरतेचे घेऊ नका

अभिनेता नाना पाटेकर यांचे अनेक चित्रपट ‘फ्लॉप’ झाले आहेत. त्यामुळे ते कोणाची (नरेंद्र मोदी) तोंडभर स्तुती करी असतील, तर त्याला फार गांभीर्याने घेऊ नका, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले. काँग्रेसच्या महारॅलीतून देशभरात परिवर्तनाचा संदेश जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांना विरोध होत आहे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करीत आहेत. सातत्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. धान उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, मात्र केंद्र आणि राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. बेरोजगारीचा मुद्दा गंभीर आहे. अनेक स्पर्धा परीक्षा झाल्या, पण निकाल जाहीर झालेले नाहीत. परीक्षांमधून कोट्यवधी रुपयांची कमाई करण्यात आली आहे, असा घणाघात पटोले यांनी केला. राम मंदिराच्या नावाखाली भाजप धर्माचे राजकारण करीत आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक असल्याचे पटोले म्हणाले.

महारॅलीतून देशात परिवर्तन

फिलगुड आणि शायनिंग इंडियाचा नारा देण्यात आला होता. त्यावेळी सोनिया गांधी यांनी संविधान बचाव रॅली नागपुरातून काढली. संविधानाच्या संरक्षणासाठी काढलेल्या रॅलीत शायनिंग इंडिया आणि फिलगुड वाहून गेले व देशात परिवर्तन घडले. हेच परिवर्तन आता नागपुरातील महारॅलीतून घडेल असा ठाम विश्वास विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये सत्तेची मस्ती आणि गर्मी दिसत आहे. दुसऱ्यांची घरे फोडून स्वतःचे घर सजविणारी ही माणेस आहेत. काँग्रेस गरीबांसाठी लढत आहे. देशातील बहुजन टिकला पाहिजे, यासाठी संघर्ष असल्याचे ते म्हणाले.

सत्ता आल्यापासून सामान्यांसाठी काहीच केलेले नाही. अशात लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा रामनामाचे स्मरण झाले आहे. दोन कोटी लोकांना रोजगाराचे आमिष दाखविण्यात येत आहे. 4 हजार 800 कारखाने बंद झालेत. मात्र धार्मिक भावना भडकावून मतं मागितले जात आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील महायुती सरकारमध्ये तीनही पक्षांची खिसा भरण्यासाठी लढाई सुरू आहे. ही अनैतिक युती आहे, असे ते म्हणाले. मध्य प्रदेशातील बीएसपीच्या एका उमेदवाराला शून्य मते मिळाली. याचा अर्थ हा आहे की, उमेदवाराने स्वतःलाही मत दिले नाही का? कुठेतरी गडबड आहे. निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपल्याचे हे द्योतक आहे. हॅकिंगचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT