Yashomati Thakur, Congress Sarkarnama
विदर्भ

Amravati : हिंमत असेल तर आमदार अपात्रतेचा निर्णय घ्या, सरकारला कुणाचे आव्हान..

Amar Ghatare

MLA Disqualification : आमदार अपात्रतेच्या प्रकरणात राज्य सरकार कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धास्तावलेल्या सरकारने काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. काँग्रेस फुटेल अशा अफवा काही लोकांना हाताशी धरून पसरविल्या जात आहेत. सरकारची हिंमत असेल तर त्यांनी आमदार अपात्रता याचिकेवरचा निर्णय घेऊन दाखवावा, असे आव्हान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. अमरावती येथे मंगळवारी (ता. 2) त्यांनी अपात्रतेच्या विषयावर भाष्य केले.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेस फुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस मधील मोठा गट बाहेर पडेल असा विरोधकांचा दावा आहे. सोशल मीडियावरील काही ‘इन्फ्लुएंजर्स’ला हाताशी धरून हा प्रचार केला जात आहे. ही वातावरणनिर्मिती मतदारांची दिशाभूल करण्यासाठी केली जात आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ही बाब महायुतीच्याही लक्षात आली आहे. त्यामुळेच महायुती. मधील घटक पक्षांचे धाबे दणाणले आहेत, असे अॅड. ठाकूर म्हणाल्या.

आतापर्यंत विविध खासगी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी आगामी निवडणुकांबाबत व्यक्त केलेले अंदाज पाहता महायुतीची राज्यात पिछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे नैतिक खच्चीकरण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. वास्तविक निवडून येण्याची शक्यता आणि क्षमता असताना काँग्रेस सोडून कोण जाईल, हा साधा विचारही सुद्धा अफवा पसरविणारे करीत नसल्याबद्दल आमदार ठाकूर यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय जर झाला तर महायुती सरकारच कोसळेल. याबाबत आता जनतेचीही खात्री झाली आहे. त्यामुळेच आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय लांबविला जात आहे. सरकारची हिंमत असेल आणि विधानसभा अध्यक्षांची सद्सदविवेक बुद्धी शाबूत असेल तर त्यांनी आमदार अपात्रतेच्या याचिकेवरचा निर्णय घेऊन दाखवावा, आता वेळ कशासाठी काढताय, असा सवालही आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या अनेक दिवसांपासून आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबितच आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता या प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. जानेवारीत सुनावणीचा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु त्याबाबतही अनिश्चितता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने महायुतीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT